मुसळधार पावसामुळं मुंबईकरांचे ‘मेगा’ हाल; रस्ते-रेल्वे-हवाई वाहतुकीचे तीन तेरा, पोलिसांचं घराबाहेर न पडण्याचे आवाहन

मुंबईमध्ये गेल्या तीन-चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. रविवारीही पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांमधील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीचेही तीन तेरा वाजले आहेत.

रविवारी पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे कुर्ला पूर्व, प्रभादेवी, परळ, दादरमधील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे.

प्रभादेवी रेल्वे स्थानक रोडवर जवळपास गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे पायी प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत.

परळमध्येही मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कुर्ला पूर्व भागातही पाणी साचल्याने रस्ते वाहतूक संथ गतीने सुरू आहे. यासह मुसळधार पावसाचा परिणाम हवाई वाहतुकीवरही झाला असून मुंबई विमानतळावरील विमानांचे उड्डाण उशिराने होत आहे.

घराबाहेर न पडण्याचे आवाहन

दरम्यान, मुंबई पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. मुंबईमध्ये सुरू असलेला संततधार पाऊस व पावसाचा जोर पाहता नागरिकांना विनंती आहे की त्यांनी किनारपट्टी भागात जाणे टाळावे आणि गरज असेल तरच घराबाहेर पडावे. खबरदारी घ्या व आपत्कालीन परिस्थितीत #१०० डायल करा, असे ट्विट मुंबई पोलिसांनी केले आहे.


दरम्यान, पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून रायगड, रत्नागिरी, साताऱ्याला अति मुसळधार ते मुसळधार, तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, जावना, परभणी शहरांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धुळे, जळगाव, नाशिक, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.