मुंबई-दोहा विमान सहा तासांच्या विलंबानंतर रद्द

मुंबईहून दोहा, कतारला जाणारे इंडिगोचे विमान आज सकाळी 10 वाजता सुमारे सहा तासांच्या विलंबानंतर रद्द करण्यात आले. फ्लाइट 6 ई 1303 पहाटे 3.55 वाजता उड्डाण करणार होते. फ्लाइटमध्ये सुमारे 300 लोक होते, मात्र विमान काही जागचे हलले नाही. पाच तास प्रवाशांना विमानात ताटकळत बसावे लागले.

इमिग्रेशन संपल्यामुळे प्रवाशांना उतरण्याची परवानगी नव्हती. या काळात पाणी आणि अन्नही मिळाले नाही, अशी तक्रार प्रवाशाने केली. एअरलाईन्स कर्मचारी व प्रवाशांमध्ये वादावादी झाली. प्रवाशांचा संताप वाढल्यावर क्रू मेंबर्सनी त्यांना उतरण्याची परवानगी दिली आणि इमिग्रेशन वेटिंग एरियामध्ये नेले. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास झाला. तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण रद्द करण्यात आल्याचे इंडिगोने म्हटले आहे.

एअरलाईन्सने मागितली माफी

इंडिगोने प्रवाशांची माफी मागितली. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे एअरलाईन्सने आपल्या पुढील फ्लाइटसाठी रिबुकिंग केले जात आहे. प्रवाशांसाठी हॉटेल बुक केली जात आहेत. असे इंडिगोने म्हटले आहे.