
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळताच आईनेही विष प्राशन करून जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना गेवराई तालुक्यातील वाहेगाव आमला येथे घडली आहे.
वाहेगाव आमला येथे खेत्रे कुटुंब वास्तव्यास असून त्यांच्याकडे केवळ एक एकर जमीन आहे. या जमिनीवरही कर्ज असून ते फेडण्याच्या विवंचनेत अभिमान खेत्रे (वय – 35) होते. याच वैफल्यातून त्यांनी सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाने आत्महत्या केल्याचे कळताच आई कौशल्या भागुजी खेत्रे (वय – 70) यांनीही विष प्राशन केले.
कौशल्याबाईंचा मंगळवारी सकाळी 10 वाजता मृत्यू झाला. घरात एकाच वेळी दोन मृत्यू झाल्याने खेत्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिमान खेत्रे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.