
म्हाडा आणि एसआरए यांच्यामार्फत संयुक्त भागीदारीत राबविल्या जाणाऱ्या 17 झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्याचे तसेच दोन्ही प्राधिकरणांनी एकमेकांशी समन्वय साधून झोपडीधारकांची पात्रता निश्चिती, प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया काम तत्काळ सुरू करण्याचे निर्देश ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी आज दिले. या रखडलेल्या पुनर्वसन प्रकल्पांच्या माध्यमातून म्हाडाला लॉटरीसाठी सुमारे 25 हजार घरे उपलब्ध होणार आहेत.
रखडलेल्या प्रकल्पांचा पुनर्विकास म्हाडा आणि एसआरए यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्त्वावर केला जाणार आहे. यापैकी आठ प्रकल्पांसंदर्भात एसआरएतर्फे 13 (2) अन्वये कार्यवाही करत सदर प्रकल्प मूळ विकासकांकडून काढून घेण्यात आले आहेत. यात गोरेगाव येथील 12, वांद्रे येथील 2, कुर्ला येथील 5, बोरिवली- दहिसर येथील दोन प्रकल्पांचा समावेश आहे. उर्वरित पाच प्रकल्पांची व्यवहार्यता तपासायचे काम सुरू आहे. पुनर्विकास प्रकल्पांमध्ये मालवणी मालाड येथील प्रकल्प सर्वात मोठा असून या ठिकाणी 14 हजार झोपडीधारक आहेत. या झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी दिले.