माऊलींच्या पालखी सोहळ्याला आळंदीतून आजोळघरी पाहुणचारासह निरोप

लाखो वैष्णव भक्तांचे मांदियाळीने भगव्या पताका उंचावत आळंदीहून उद्योगनगरी मार्गे पुण्यनगरीकडे माऊलींचा पालखी सोहळा मार्गस्थ झाला. अलंकापुरीतील जुना श्रीपादबुवा गांधी वाडा नव्याने विकसित दर्शनबारी मंडप आजोळघरी ( गांधीवाडा ) माऊलींचे पालखी सोहळ्याने पहिल्या मुक्कामात माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी, सुधीर गांधी परिवारासह आळंदीकरांचा पाहुणचार घेतला. श्रींचे वैभवी पालखी सोहळ्याने रविवारी भल्या पहाटे ( दि. 30 ) दोन दिवसांचे मुक्कामासाठी पुण्यनगरी मार्गे पंढरी जाण्यास आळंदीकरांचा हृदयस्पर्शी निरोप घेतला. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुण्यनगरीत दोन दिवस विसावणार असून मंगळवारी ( दि. 2 ) दिवेघाट मार्गे सासवडला निघेल.

आळंदीतील एका दिवसाच्या मुक्कामानंतर श्रींना सोहळ्यास निरोप देण्यासाठी आळंदीकर धाकट्या पादुका, थोरल्या पादुका मंदिरापर्यंत आले होते. सोहळ्यात सुमारे बत्तीस दिवसांचा विरह आळंदीकरांना सहन करावा लागणार असल्याने माऊलींना निरोप देताना अनेकांचे नेत्रांच्या कडा पाणावल्या. तर अनेकांचे हृदय भरून आले होते. माऊली मंदिरात तसेच पहिल्या एक दिवसाचे मुक्कामासाठीचे नियोजन देवस्थानचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, विश्वस्त भावार्थ देखणे, व्यवस्थापक माऊली वीर यांनी पोलीस, महसूल प्रशासन यांनी केलेल्या सूचना प्रमाणे कामकाज करीत नियोजन केले.

गेल्या चार दिवसांपासून आळंदीत लाखो वैष्णवांचा हरिनामाचा गजर चालू होता. रविवारी पहाटे भाविकांना आजोळघरातील माऊलींच्या पादुकांचे दर्शन पालखीसह रथातून झाले. आजोळघरी गांधी कुटुंबीयांच्या वतीने रुद्राभिषेक आणि पादुका पूजन करण्यात आले. त्यांच्या वतीने नैवेद्य दाखविण्यात आला. देवस्थानच्या वतीने पहाट पूजा आणि आरती झाली. यानंतर उर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या वतीने माऊलींना प्रथा परंपरेने नैवेद्य वाढविण्यात आला. दरम्यान आळंदीकर ग्रामस्थ माऊलींची पालखी खांद्यावर उचलण्यासाठी पहाटे सज्ज झाले होते. सहाच्या सुमारास श्रीची पालखी आजोळघरातून आळंदीकर खांदेकरी यांनी खांद्यावर घेत बाहेर आणली. त्यानंतर माऊली – माऊली नामाच्या गजरात व “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या नामजयघोषात पालखी नगरपालिका चौकात खांदेकरी ग्रामस्थांनी नाचवित आणली. या ठिकाणी स्व. माजी नगराध्यक्ष नानासाहेब गरुड यांचे वतीने सुदीप गरुड आणि गरुड परिवाराने लक्षवेधी पुष्प सजावटीने सजलेल्या वैभवी चांदीचे रथात आळंदीकरांनी पालखी फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथात ठेवली. आळंदी पालिकेच्या वतीने देवस्थान समिती, मालक, चोपदार, दिंडीकरी या मानकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी आळंदी नरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांचे सह नगरपरिषद, महसूल अधिकारी, आरोग्य अधिकारी, आळंदी नगरपरिषदेचे माजी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, आळंदीतील प्रदक्षिणा मार्ग, पालिका चौक, देहू फाटा, चोविसावाडी, वडमुखवाडी या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी माउलींच्या पालखी रथाचे तसेच पालखीतील पादुकांचे दर्शनासाठी तसेच सोहळ्यास निरोप देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पंचक्रोशीतील महिला, पुरुष, लहान मुले माउलींच्या रथासोबत चालत होते. दरम्यान, विविध मंडळे, संघटनांच्या वतीने सोहळ्यातील वारकऱ्यांना चहा, पोहे, गुडदाणी, पाणी वाटप उत्साहात करण्यात आले.

अलंकापुरीत स्वच्छता अभियानास प्रारंभ
आळंदीतून श्रींचे पालखी सोहळ्यास निरोप देत आता आळंदीत स्वच्छ आळंदी, सुंदर आळंदी, निर्मल आळंदी अंतर्गत आषाढी वारी प्रस्थान नंतर प्रभावी पणे शहर स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता अभियान आळंदी नगरपरिषदेने सुरु केले आहे. शहरातील सर्व ठिकाणचा कचरा साफ सफाई करून नागरिक -भाविकांचे आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. स्वच्छतेस महत्त्व देत परिसर निर्मल करण्याचे सूचना विभाग प्रमुख, कामगार आणि संबंधित यंत्रणा यांना दिल्या असल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.

वारीच्या परंपरा कायम ठेवण्यास प्राधान्य- बाळासाहेब आरफळकर
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात श्री गुरु हैबतबाबा यानी ज्या परंपरा घालुन दिल्या आहेत त्या सर्व परंपरा जोपासल्या जातील असे पालखी सोहळ्याचे मालक व हैबतबाबांचे वंशज बाळासाहेब आरफळकर पवार यानी सांगितले . संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदीतून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाण्यास मंदिरातून प्रस्थान झाले. या प्रस्थान सोहळ्यात पुण्यनगरीत प्रवेशण्यापूर्वी पालखी सोहळ्याची माहिती दिली. मालक आरफळकर म्हणाले , संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वैभवी पालखी सोहळ्याला मोठी परंपरा आहे. पालखी सोहळ्यात परंपरेने ज्याना मान आहेत ते कोठेही डावलले जाणार नाहीत . पालखी सोहळ्यात सर्वाना विश्वासात घेउनच निर्णय घेतले जातात .मुक्कामाचे ठिकाणी गावकऱ्यांच्या भावना जपल्या जातील. ऱिंगण सोहळ्याबाबत बोलताना आरफळकर म्हणाले , पालखी सोहळ्यात तीन उभी व चार गोल रिंगणे होतात. अलीकडच्या काळात या रिंगणाना मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. सोहळा हा परंपरे प्रमाणेच चालला पाहिजे. ज्यानी सोहळ्यासाठी पूर्वीच्या काळी मदत केली आणि सोहळ्याचे वैभव वाढविले. तो वारसा पुढे बरोबर घेऊन यापुढील वाटचाल कायम राहील असे ते म्हणाले.

आजोळघर गांधी वाड्यात विद्युत रोषणाई
आळंदी मंदिरात देवस्थानने माउली मंदिरा लगतच्या आजोळघर गांधी वाड्यात नवीन दर्शन बारीसह श्रींचे आजोळघर विकसित केले आहे. या ठिकाणी श्रींचे पालखीचा पहिला मुक्काम राहतो. याठिकाणी मंडप व विद्युत रोषणाई आणि भाविकांची दर्शन बारी श्रींचे सोहळ्यास सजविण्यात आली होती. आळंदी वैभवात वाढ करणारे बांधकाम सुमारे पाच कोटी रुपये खर्चून रामवाड्यासह जुन्या गांधी वाड्याचे जागेत करण्यात आले आहे. आता श्रींचे आजोळघर व नवीन दर्शन बारी मंडप म्हणून नव्याने या गांधी वाड्याचे बांधकामाची ओळख होत आहे. विकसित दर्शनबारी भाविक वारकरी यांचे साठी वापरास खुली करण्यात आली आहे.