जरांगे यांचे आजपासून पुन्हा उपोषण, मराठय़ांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे

राज्य सरकारने मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे. एकीकडे गोड बोलायचे आणि दुसरीकडे केसाने गळा कापायचा असे सरकारचे धोरण असल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारपासून कठोर उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. उपोषणापूर्वी सरकारने काही चर्चा केली असती तर मार्ग निघाला असता, परंतु सरकारची इच्छाशक्तीच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता सर्व मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही, असा निर्धारही जरांगे यांनी बोलून दाखवला.

मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत चार वेळेस उपोषण केले. प्रत्येक वेळेस सरकारने मुदत मागून घेत आरक्षणाचे भिजत घोंगडे कायम ठेवले. मराठा समाजाची मागणी नसतानाही वेगळय़ा प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. सगेसोयऱयांचा अध्यादेश काढूनही त्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही. मुळात मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. सरकारच्या वतीने बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत काल भेटायला आले होते. त्यांनी मुंबईत चर्चा करण्यासाठी या असा निरोप दिला. परंतु मी नकार दिला, असेही जरांगे म्हणाले.