भुजबळ-फडणवीसांचा महाराष्ट्र रक्तबंबाळ करण्याचा डाव -जरांगे

मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ाआडून जातीजातींत भांडण लावण्याचे काम सुरू आहे. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्र रक्तबंबाळ करायचा डाव आहे. दंगली घडवण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केला. महाराष्ट्र रक्तबंबाळ करून त्यांना सत्ता ताब्यात घ्यायची आहे, पण मराठा समाजात तसे होऊ देणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.

आता तरी मराठा समाजातील विविध पक्षात कार्यरत असलेल्या नेत्यांनी शहाणे व्हावे. कारण जर हीच ती वेळ आहे. नंतर तुम्हाला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाज इतका खमक्या आहे की, एकटा समाज सर्व विधानसभेत पाडू शकतो, तर अनेकांना निवडूनदेखील आणू शकतो, असे मनोज जरांगे म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांची भूमिका शॉकिंग

प्रकाश आंबेडकर साहेब प्रत्येकवेळी मार्ग सांगायचे, तुम्हाला सलाईनमधून औषध घालतील तेच सांगायचे. आज हे इतपं शॉकिंग वाटतंय की आता तेच म्हणाले सगेसोयरेंची अंमलबजावणी करू नका, त्यांचा पक्ष म्हणतोय की नोंदी रद्द करा, असे सांगत आहे. त्यांच्या भूमिकेवर मला आता शंका येऊ लागली आहे, असे जरांगे म्हणाले.