महाराष्ट्र भुजबळांची मक्तेदारी नाही; मराठ्यांच्या नादी लागाल तर ‘कार्यक्रम’, जरांगंचा मिंधे सरकारला दम

मराठा आरक्षण 13 जुलैपर्यंत मिळालेच पाहिजे. महाराष्ट्र म्हणजे छगन भुजबळांची मक्तेदारी नाही. भुजबळांचे ऐकून निर्णय घेण्यास चालढकल करणार असाल तर त्याचे परिणाम सरकारला झेपणार नाहीत. मराठय़ांच्या नादी लागाल तर ‘कार्यक्रम’ करेन, असा दम मनोज जरांगे-पाटील यांनी मिंधे सरकारला भरला.

हिंगोलीत शनिवारी मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत सहभागी होण्यासाठी जिल्हाभरातून लाखो मराठा समाजबांधव आले होते. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली. 13 जुलैपर्यंतची मुदत सरकारने मागून घेतली आहे. आरक्षण, सगेसोयऱ्यांचा अध्यादेश ही सरकारचीच जबाबदारी आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यामुळे आम्हाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीचा जरांगे यांनी पुनरुच्चार केला.

आमचा जोर कुठेच कमी झालेला नाही. आम्हाला आरक्षण द्या. आमच्यावर अन्याय करू नका. आम्ही एकटेच 50 ते 55 टक्के आहोत. कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. आम्ही संयम ठेवत आहोत. आमचा नाइलाज होऊ देऊ नका, असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला आहे.

भुजबळांचे ऐकाल तर 288 जागांवर कार्यक्रम

मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणात मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला. मराठा आरक्षणात भुजबळ आडकाठी आणत आहेत. त्यांचे ऐकून सरकार निर्णय घेणार असेल तर विधानसभेच्या 288 जागांवर ‘कार्यक्रम’ होईल! मराठय़ांच्या नादी लागला तर त्याचा परिणाम सरकारला झेपणार नाही, असा स्पष्ट इशारा यावेळी मनोज जरांगे यांनी दिला.

कनेरगाव नाक्यावर जंगी स्वागत

मराठा आरक्षण जनजागृती रॅलीत सहभागी होण्यासाठी आलेले मनोज जरांगे यांचे कनेरगाव नाक्यावर भव्य स्वागत करण्यात आले. बळसोंड येथे जेसीबीने त्यांच्यावर फुले उधळण्यात आली. क्रेनच्या मदतीने त्यांना गुलाबाचा हार घालण्यात आला. दुपारी अडीच वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला अभिवादन करून रॅलीचा प्रारंभ झाला. यावेळी 51 उखळी तोफांची सलामी देण्यात आली. रॅलीच्या मार्गात असलेल्या महापुरुषांच्या पुतळय़ांना अभिवादन करण्यात आले.

रॅलीत सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांची असुविधा होऊ नये यासाठी खास 1200 पुरुष आणि 200 महिला स्वयंसेविकांचे पथक तैनात होते. रॅलीच्या मार्गावर सात ठिकाणी आरोग्य पथकेही सज्ज ठेवण्यात आली होती. रॅलीत सहभागी समाजबांधवांना वेळोवेळी ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्यात येत होत्या. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

13 तारखेनंतर मुंबईत

सरसकट मराठय़ांना कुणबी दाखले द्या ही आमची मागणी आहे. मराठय़ांना आरक्षण दिले नाही तर 13 तारखेनंतरचा निर्णय हा तुम्हाला झेपवणार नाही. बहुतेक सरकारची आणि आपली भेट ही मुंबईतच होईल, असे सांगत यापुढे मुंबईत आंदोलन करण्याचे संकेत मनोज जरांगे-पाटील यांनी दिले.