सर्वांगीण विचार करून सरकारला महिन्याची मुदत दिली, मनोज जरांगे पाटील यांचे स्पष्टीकरण

मराठा आरक्षणासह समाजाच्या अन्य मागण्यांसंदर्भात शब्द दिल्याने सर्वांगीण विचार करूनच राज्य सरकारला महिन्याची मुदत दिली आहे, असे स्पष्टीकरण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज शुक्रवारी दिले. दगा, फटका देऊ नका, नसता विधानसभा निवडणुकीत उतरून धडा शिकवू असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण, सगेसोयरे संबंधीच्या अध्यादेशाची अंमलबजावणी या व अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटे येथे बेमुदत उपोषण आरंभिले होते. या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी मंत्री शंभुराजे देसाई यांच्या नेतृत्वाखाली समितीने जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. मराठा समाजाचे प्रश्न महिन्यात मार्गी लावू असा शब्द दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. प्रकृती अस्वस्थ्यामुळे जरांगे पाटील यांना गुरूवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आज शुक्रवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारला एक दिवसही वेळ देणार नव्हतो. पण, मानसन्मान करावा म्हणून आणि आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकवायचे आहे असे मंत्र्यांनी सांगितल्याने सरकारला महिन्याचा वेळ दिला, आता दगा, फटका नको इतकेच त्यांना सांगितले, असेही जरांगे पाटील म्हणाले.

एस आय टी रद्द केल्याचे सांगितले जात आहे, परंतु त्या संबंधीचे पत्र अद्याप प्राप्त झालेले नाही हे स्पष्ट करून जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या तरुणाविरूद्ध दाखल केसेस मागे घेण्याबाबत सांगितले. फडणवीस फोन वर बोलले. मात्र, खरं काय माहित नाही, कागद हाती आलेला नाही असेही ते म्हणाले. या संदर्भात धोका झाला तर हा समाजाचा सगळ्यात मोठा अपमान असेल आणि धोका दिला तर मग त्यांचे हाल होतील.. समाजाची बैठक घेऊन विधानसभेबाबत निर्णय जाहीर करू. असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.