समाजाची ताकद तेथे उमेदवार, नसतील तिथे पाडापाडी, मनोज जरांगे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले!

जिथे ताकद आहे, तिथे उमेदवार उभे करणार, अशी डरकाळी फोडत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. उमेदवार नसतील तिथे पाडापाडी करून मराठा समाजाला संपविण्याचा विडा उचलणार्‍याला संपवणारच असा इशाराही त्यांनी फडणवीस यांना दिला. दरम्यान, एससी, एसटीसाठी राखीव मतदारसंघात उमेदवार देणार नाही. मात्र २८८ पैकी लढण्याचे मतदारसंघ तीन दिवसांत जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले. आंतरवाली सराटीत आज रविवारी झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

जरांगे यांनी आज आंतरवाली सराटीत समाजाची बैठक बोलावली होती. ते म्हणाले की, मराठ्यांची मान आजपर्यंत कधीही खाली होऊ दिली नाही. यापुढेही समाजाची उंची कायम ठेवा, काही झाले तरी मराठा समाज संपला नाही पाहिजे. निवडणुका येतील -जातील, आपल्याला हट्ट करायचा नाही. निवडणुकीसाठी समाज तुटायला नको. उमेदवार उभे करायचे की पाडायचे असे विचारता लोकांनी हात वर करून लढायचे सांगितले. उमेदवार उभे करण्यासाठी किंवा पाडापाडीसाठी समाजाची एकजूट कायम ठेवा. मला आणि समाजाला उघडे पाडू नका. उघडे पडल्यावर जात संपेल असेही ते म्हणाले.

एस्सी, एसटी राखीव जागांवर उमेदवार नाही

मुस्लिम, एससी आणि एसटीच्या जागा आहेत. तिथे उमेदवार उभा न करता आपल्या विचाराच्या उमेदवाराला लाखभर मतदान देवून निवडून द्या असे ते म्हणाले. जिथे आपण उमेदवार उभा करणार नाही, जिथे उमेदवार उभे करायचे नाहीत तिथे आमच्या विचाराशी साधर्म्य असलेल्या उमेदवार जो ५०० रुपयांच्या बॉण्डवर मी तुमच्या मागण्यांशी सहमत आहे, असे लिहून देईल त्याला निवडून देऊ. अन्यथा त्याला पाडू, अशी भूमिका त्यांनी मांडली.

समीकरण जुळवणे महत्त्वाचे

कुठे मराठ्यांची ताकद आहे ते गणित पाहणे व समीकरण जुळवणे महत्त्वाचे आहे. मी समीकरण जुळवतोय. नाही जुळलं तर अवघड आहे. संमिश्र ताकत ठेवली तर मराठा जिंकू शकतो. एक कोपरा धरून चाललो तर लढणे जिकिरीचे होईल म्हणून काही निवडून आणू, काही पाडू. ३६ मतदारसंघ असे आहेत तिथे मराठाच निवडून आणू शकतो. त्यामुळे समीकरण नाही जुळलं तर ज्याने मराठ्यांना संपवले आहे, त्याला संपवायचं हे धोरण कायम असणार असा इशारा त्यांनी दिला.

फडणवीसांनी लेकरांचं वाटोळं केलं

या वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, इंग्रज तरी बाहेरचे होते, देवेंद्र फडणवीसइतका क्रूर माणूस पाहिला नाही. आई-बहिणींचे डोके फोडले. आम्हाला संपवायला निघाले होते. आता आम्ही त्यांना संपवण्यासाठी तयार आहोत. कुठलीही समिती नाही. अहवाल नाही. निवेदन नाही, आंदोलन नाही, रस्ता रोको नाही, आरक्षणासाठी आत्महत्या नाही, कुठे लढाई नाही, कुठलेच काही नसतानाही इतर जाती आरक्षणात घातल्या. इतका फडणवीस यांना मराठाद्वेष आहे. भाजपाबद्दल आमचा द्वेष नाही. तरीही त्यांनी आमच्या लेकरा-बाळांचं वाटोळं केलं. वेळ आली तर दहा पाऊले मागे घ्या, पण आपल्याला संपविण्यासाठी निघालेल्यांना संपविण्यासाठी काम करा, असे आवाहनही त्यांनी केले.

समाजासाठीच ही भूमिका

ज्यांना उमेदवारी अर्ज भरायचे आहे. त्यांनी भरा, पण २९ ऑक्टोबरला मी सांगितलेल्या ठिकाणचे अर्ज मागे घ्या. कुणाचा अर्ज ठेवायचा आणि कुणी काढायचा हे जाहीर केले जाईल. ज्याने सांगूनही अर्ज मागे घेतला नाही, त्याने पैसे खाल्ले असे जाहीर केले जाईल. कोणत्या मतदारसंघात लढायचे याचे अंतिम चित्र २३ ऑक्टोंबर रोजी जाहीर करू. एका जातींवर लढून उमेदवार निवडून आणणे सोपे नाही. परंतु पाडापाडी करणे सोपे आहे. सावधगिरीची भूमिका म्हणून समाजांचे मन मोडायचे नाही म्हणून निवडणूक लढणार असल्याचे जरांगे म्हणाले.