शालेय शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय, 100 पटाच्या विद्यार्थीसंख्येला मुख्याध्यापकपद ग्राह्य धरणार

राज्यातील शाळांत असलेल्या 150 विद्यार्थी ऐवजी 100 पटाच्या विद्यार्थिसंख्येला मुख्याध्यापकपद ग्राह्य धरण्याबरोबरच पायाभूत पदांना संरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय मंगळवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला. मंत्री केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील चर्नीरोड येथील जवाहर बालभवन येथे बैठक झाली. या बैठकीत 15 मार्च 2024 च्या संच मान्यता शासन निर्णयात सुधारणा करणे यासह विविध प्रश्‍नांवर चर्चा होऊन अनेक निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारती राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली.

सुनिल गाडगे म्हणाले, शासनाने 15 मार्च 2024 रोजी काढलेला संच मान्यता आदेश हा बऱ्याच शाळांना मारक ठरणारा आहे. या आदेशामुळे मुख्याध्यापक पद तसेच शाळेतील शिक्षकांची पदे कमी होणार असून याचा मराठी माध्यमांच्या शाळांना मोठा फटका बसणार आहे. या आदेशामुळे विद्यार्थी संख्या कमी होणार असून बहुजन समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणार नाही. त्यामुळे याबाबतीत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली. मुख्याध्यापक पदासाठी 150 पट संख्येऐवजी 100 पट संख्या गृहीत धरून मुख्याध्यापकपद मान्य केले जाईल, तसेच मुख्याध्यापकपद रद्द झाल्यास त्या पदाला संबंधित मुख्याध्यापक सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा पटसंख्या वाढ होईपर्यंत संरक्षण दिले जाईल, अशी दुरुस्ती करण्याचे निर्देश केसरकर यांनी दिले.

या बैठकीत संचमान्यतेच्या इतर निकषावर चर्चा होऊन, सध्या अस्तित्वात असलेली पदे टिकविण्याचे निकष वेगळे असतील व वाढीव पद मिळण्यासाठीचे निकष वेगळे असतील हे मान्य करण्यात आले. यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी मानधनात वाढ करणे, पोषण आहार मानधनात वाढ करणे, येत्या दोन दिवसात शिक्षकेतर कर्मचारी संच मान्यता करणे आणि शिक्षकेतर कर्मचार्यांच्या वेतनातील त्रुटीबाबत सुनावणी दरम्यान सकारात्मक निर्णय घेणे आदी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा सौ. आशा मगर, सोमनाथ बोंतले, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हासचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, जिल्हा सचिव महेश पाडेकर, संभाजी पवार, कार्यवाह संजय भुसारी, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, सिकंदर शेख, संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, कैलास जाधव, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी , श्रीकांत गाडगे, रेवण घंगाळे जॉन सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे. सोनाली अकोलकर विनाअनुदानितच्या अध्यक्षा रूपाली कुरूमकर आदींनी दिली.