राज्यातील शाळांमध्ये अठरा लाख विद्यार्थी घटले

राज्यात 2018-2019 च्या तुलनेत 2023-24 मध्ये विविध कारणांमुळे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 18 लाख 55 हजारांनी घटल्याची धक्कादायक आकडेवारी ‘समर्थन’ या स्वयंसेवी संस्थेने सादर केली आहे. यापैकी सर्वात जास्त संख्या अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची आहे. अनेक शाळा अनधिकृत ठरल्याने विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आला आहे.

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल, पॅगचा अहवाल, विनियोजन लेखे, शासनाच्या विविध विभागांनी व महामंडळांनी प्रकाशित केलेले अहवाल आणि 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातीलतरतुदींच्या आधारावर समर्थन या स्वयंसेवी संस्थेने शिक्षण विभागाचा सर्वंकष अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात राज्यातील प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांचे वास्तव, विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षण खात्यावरील खर्च याचा तपशील नमूद केला आहे.

राज्यातील प्राथमिक शाळांचे वास्तव

  • एकूण 1 लाख 4 हजार प्राथमिक शाळांपैकी 10 हजार 937 शाळांमध्ये (9. 95 टक्के) अद्याप पिण्याच्या पाण्याची सोय नाही. z 4 हजार 388 (4.2 टक्के) प्राथमिक शाळांमध्ये मुलींसाठी शौचालय सुविधा नाही.
  • 29 हजार 50 (27.8टक्के) प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये संगणक व्यवस्था पोहोचलेली नाही. z 13 हजार 584 (7.10 टक्के) शाळांना खेळाचे मैदान नाही. z 7 हजार 419 (7.10 टक्के) शाळांना ग्रंथालये नाहीत. z 5 हजार 851 (5.6 टक्के) शाळांना विद्युत जोडणी नाही.

राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची परिस्थिती

राज्यात 28 हजार 986 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा. z 1 हजार 391 (4.8 टक्के) माध्यमिक शाळांना संरक्षक भिंत नाही. z 1 हजार 391 (4.8 टक्के) शाळांना खेळाचे मैदान नाही. z 1 हजार 43 (3.6 टक्के) शाळांना ग्रंथालय नाही. z 1 हजार 478 (5.6 टक्के) शाळांना संगणक नाहीत. z 377 (1.3 टक्के) शाळांमधील मुलींना शौचालयाची सुविधा नाही.

सात वर्षांत फक्त 57 हजार कोटी खर्च

राज्यातील सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या प्रगतीसाठी शिक्षण महत्त्वाचे आहे, पण मागील सात वर्षांत राज्याच्या अर्थसंकल्पात शालेय शिक्षण विभागावर सरासरी फक्त 57 हजार 84 कोटी रुपये खर्च झाल्याची आकडेवारी आहे. 2023-24 मध्ये शिक्षण विभागातील एकूण खर्चापैकी सर्वाधिक म्हणजे 56.10 टक्के रक्कम प्राथमिक शिक्षणावर खर्च झाली आहे. मात्र 2024-2025 च्या सुधारित खर्चाशी तुलना करता त्यात 0.2 टक्के घट होऊन हा खर्च 55.90 टक्क्यांवर आला आहे.

विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण चिंताजनक

2023-2014 मध्ये इयत्ता 6 वी ते 10 वीदरम्यान 3 लाख 97 हजार 208 विद्यार्थ्यांची शाळेतून गळती झाली. 2023-24 मध्ये प्राथमिक म्हणजे इयत्ता 6 वी ते 8 वीमधील 33 हजार 507 इतक्या विद्यार्थ्यांची गळती झाली. त्यापैकी 20 हजार 499 विद्यार्थी, तर 13 हजार 8 इतक्या मुलींची शाळेतून गळती झाली.

विद्यार्थी घटण्याची कारणे

राज्यात 2018-19 मध्ये राज्यातील शाळांमध्ये 2 कोटी 32 लाख 31 हजार 693 विद्यार्थी शिकत होते. त्यातुलनेत 2023-24 मध्ये विद्यार्थ्यांची संख्या 2 कोटी 13 लाख 75 हजार 970 इतकी झाली. विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांची संख्या 18 लाख 55 हजार 723 नी घटली आहे. या कालावधीत अनधिकृत शाळांचे पेव फुटल्यामुळे तसेच अनेक शाळांना मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम 2009 च्या नियमानुसार अनेक शाळा अनधिकृत ठरल्यामुळे अशा शाळांमधून शिकणारे विद्यार्थी यामधून वगळले गेले. त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी झाल्याचा समर्थनच्या अहवालात नमूद केला आहे.