विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येण्यासाठी जोमाने कामाला लागा; नाना पटोले यांचे आवाहन

लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजप आणि एनडीएला त्यांची जागा दाखवली आहे. आता राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात महायुती सरकारविरोधात रोष आहे. त्यामुळे या निवडणुकीतही जनता महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले म्हणून गाफील राहू नका. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघीडीची सत्ता येण्यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले आहे. काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले.

लोकसभा निवडणुकीत जनता इंडिया आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. लोकसभेत चांगले यश मिळाले म्हणून गाफील राहू नका. विधानसभा निवडणुकीसाठीही मेहनत करा, जनतेपर्यंत जा, महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी काम करा, असे नाना पटोले म्हणाले आहेत. काँग्रेस सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत देशभरातील विविध पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन केली. तसेच राज्यात महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवली. आता राज्यातही परिवर्तन व्हावे ही जनतेची भावना आहे, आपण जनतेपर्यंत जाऊन महाविकास आघाडीचा विचार पोहचवला पाहिजे, असेही पटोले म्हणाले.

भाजप देश तोडण्याचे काम करत असताना राहुल गांधींनी यात्रेद्वारे देश जोडण्याचे काम केले आहे. संघटनेसाठी काम करणाऱ्यांची दखल देऊन त्यांना योग्य ती संधी दिली जाते. पक्षासाठी काम करा व विधानसभेवर महाविकास आघाडीच्या विजयाची पताका फडकवा, असेही नाना पटोले कार्यकर्त्यांना म्हणाले.