
शैक्षणिक कामकाजासाठी लागणाऱया सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याबाबत विधानसभेत माहिती दिली. शिवसेनेने हे मुद्रांक शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी वेळोवेळी केली होती. आज त्या मागणीला यश आले.
कुठल्याही शैक्षणिक कामाकरिता जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर अथवा राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच शिक्षणाकरिता यापुढे कुठलेही मुद्रांक शुल्क लागणार नाही. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर हे दाखले मिळवावे लागतात. प्रत्येक दाखल्यासाठी 500 रुपये याप्रमाणे सुमारे तीन हजार रुपये यासाठी पालक खर्ची घालतात. नव्या निर्णयामुळे पालकांचा आर्थिक भुर्दंड वाचणार आहे. साध्या कागदावर अर्ज लिहून सेतू कार्यालयामार्फत तहसील कार्यालयात दिल्यानंतर तातडीने दाखले मिळणार आहेत. मागील हिवाळी अधिवेशनात मुद्रांक शुल्क माफ करण्याची मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी केली होती.