कौटुंबिक न्यायालयात ई-फायलिंग करताना तांत्रिक अडचणी, वकिलांचे मुख्य न्यायमूर्तींना पत्र

कौटुंबिक न्यायालयात ई-फायलिंग करताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने वकील तसेच याचिकाकर्त्यांना त्रास होत आहे याप्रकरणी कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहित याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.

मुंबईतील कौटुंबिक न्यायालयाच्या ई-फायलिंग प्रणालीतील तांत्रिक समस्यांमुळे दावा शपथपत्रे उशिराने दाखल होत आहेत. संकेतस्थळ वारंवार कोलमडल्याने शपथपत्र नोंदणीच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे ही व्यवस्था सुधारण्यात यावी अशी मागणी करत अॅड. तारा हेगडे व अॅड. श्रद्धा दळवी यांनी पुढाकार घेत हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिले आहे. ई-फायलिंग सुविधा असूनही शारीरिक प्रत मागितली जात असल्याने कागदविरहित फायलिंगचा उद्देश साधला जात नसल्याचे पत्रात म्हटले आहे.