
वलीमाचा कार्यक्रम करून आटपून घरी परतत असताना चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकला अपघात झाल्याची घटना लातूरमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात 12 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले. जखमींपैकी 3 जणांना अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अन्य किरकोळ जखमींना अहमदपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अहमदपूर येथील धानोरा गावातील मेहताब शेख यांच्या मुलाचा विवाह गुरुवारी संपन्न झाला. त्यानंतर शुक्रवारी वलीमाचा कार्यक्रम आटोपून वधूकडील 60 ते 65 नातेवाईक मंडळी ट्रकने धानोरा येथून परभणीला आपल्या गावी परतत होती.
किनगाव जवळील धानोरा कॉर्नरजवळ चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो कठड्याला धडकून उलटला. यात 12 वर्षांचा अलमाश शेख हा जागीच ठार झाला. तर अन्य 40 जण जखमी झाले. मुलाच्या मृत्यूमुळे शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.