
ज्येष्ठ कवी, लेखक कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन ‘मराठी भाषा गौरव दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने शुक्रवार, 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता वरळी येथील नेहरू सायन्स सेंटरच्या सभागृहात मधुरा वेलणकर-साटम यांच्या ‘मधुरव – बोरू ते ब्लॉग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असून 24 फेब्रुवारीपासून प्रवेशिका उपलब्ध होतील.
मराठी भाषेचा इतिहास हा प्रेक्षकांना जाणून घेता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपली मातृभाषा मराठी कशी जन्मली, वाढली, अस्तित्वासाठी लढली, आपल्यापर्यंत पोहोचली आणि कशी श्रीमंत झाली हे हसतखेळत, नृत्य, संगीताला प्राधान्य देत ही कलाकृती सादर केली जाते. डॉ. समिरा गुजर यांनी या नाटकासाठी संशोधन आणि लेखन केले आहे. स्वतः मधुरा यांचा यात सहभाग आहे. शिवाय आकांक्षा गाडे, आशीष गाडे हे कलाकार म्हणून त्यांच्या सोबतीला आहेत.