
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धार पाहून रह करण्याची घोषणा करण्यात आलेला वादग्रस्त ठेकेदारधार्जिणा शक्तिपीठ महामार्ग सत्तेवर येताच महायुती सरकारकडून पुन्हा एकदा लादला जात आहे. पूर्वीच्याच आराखड्यानुसार हा महामार्ग रेटण्याच्या हालचाली स्पष्टपणे सुरू असून, सत्ताधारी पक्षातील काही आमदार त्याचे उघड उघड समर्थन करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून पुन्हा एकदा शक्तिपीठ महामार्ग विरोधात एल्गार पुकारला आहे.
शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा हा शक्तिपीठ महामार्ग कदापि होऊ देणार नाही, असा निर्धार करत अधिवेशन काळात दि. 12 मार्च रोजी मुंबईतील विधानभवनावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय आज शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीत घेण्यात आला. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या निर्णयाची घोषणा केली. यावेळी उपस्थित 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी, ‘एक इंचही जमीन शक्तिपीठ महामार्गाला देणार नाहीं’, अशी शपथ घेतली.
शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी येथील शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित बैठकीला कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, बीड, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांतील शेतकरी उपस्थित होते.
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘अन्य पर्यायी रस्ते असतानाही कंत्राटदारधार्जिणा असलेला हा शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे. कोल्हापुरातूनच या महामार्गाला सुरुवातीस विरोध झाला. विधानसभा निवडणुकीत याची धास्ती वाटल्याने केवळ कोल्हापूरमध्ये तो रद्द झाल्याची घोषणा सरकारने केली. पण, पुन्हा सत्तेवर येताच ही आवई असल्याचे समोर येऊ लागले आहे.
सध्या या महामार्गासंदर्भात रेखांकन जाहीर केली आहेत. ती पूर्वी होती तशीच असून, यामध्ये बदल नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या महामार्गाला कोल्हापूरकर पुन्हा एकदा तितक्याच ताकदीने विरोध करतील. येत्या अधिवेशनात महाविकास आघाडीचे आमदारही या महामार्गाला कडाडून विरोध करतील.’
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोल्हापूर सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, ‘ठराविक उद्योगपतींना पोसण्यासाठीच या महामार्गाचा घाट घातला जात असल्याने, आम्ही तो होऊ देणार नाही. कोल्हापूरकर आधी सांगतील, नंतर समजावतील तरीसुद्धा नाही ऐकले तर ठोकतील’, असा इशाराही देवणे यांनी दिला. समितीचे समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले, ‘या महामार्गाला कोणत्या आमदारांचे समर्थन आहे हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे’, असे आवाहन केले.
यावेळी गजेंद्र येळकर (लातूर), विजयकुमार पाटील (सोलापूर), शांतिभूषण कच्छवे (परभणी), घनश्याम नलवडे (सांगली), सूरज माळेवार (हिंगोली), कचरू मुधोळ (नांदेड), संभाजी फडतारे (धाराशिव), सुदर्शन पडवळ (धाराशिव) यांनीही भाषणात शक्तिपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला. यावेळी आमदार जयंत आसगावकर, शिवाजी मगदूम, सर्जेराव देसाई, आनंदा पाटील, प्रकाश पाटील, शशिकांत खोत, आर. एस. कांबळे, उत्तम सावंत उपस्थित होते.
जिल्ह्यातील आमदारांची 1 मार्चपूर्वी पत्रे घेणार
शेतकऱ्यांचा विरोध असतानाही मुख्यमंत्री आमदारांचे समर्थन असल्याचा दावा करीत आहेत, तर दुसरीकडे काही आमदार शक्तिपीठाला आमचा विरोध असल्याचे शेतकऱ्यांना सांगत आहेत. त्यामुळे ही संभ्रमावस्था दूर करण्यासाठी आमदारांचे शक्तिपीठाला समर्थन आहे की विरोध याचे लेखी पत्र त्यांच्याकडून येत्या 1 मार्चपर्यंत घ्या, अशी सूचना आमदार सतेज पाटील यांनी मांडली. त्याला सर्व शेतकऱ्यांनी हात उंचावून पाठिंबा दिला.