
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेलेला असतानाच या हल्ल्यातून बचावलेल्या कुटुंबांच्या कहाण्याही समोर येत आहेत. कर्नाटकातील हेडगे कुटुंब यापैकीच एक. आजही त्या दिवसाची आठवण काढताना त्यांच्या अंगावर शहारे येतात, अंगाचा थरकाप उडतो.
कर्नाटकातील प्रदीप हेडगे, त्यांची पत्नी शुभा हेडगे आणि मुलगा सिद्धांत हे जम्मू-कश्मीरमध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. हेडगे कुटुंब 21 एप्रिल रोजी श्रीनगर येथे पोहोचले. हल्ला झाला त्याच दिवशी ते पहलगामकडे निघाले होते. बैसरन खोऱ्यात त्यांना जायचे होते. पण दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचवा.
आम्ही तीन घोडे भाड्याने घेतले होते. पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर चिखल साचला होता. त्यामुळे आम्हाला शिखरावर पोहोचायला 1 तास लागला. घोडेस्वार पर्यटकांना बैसरण येथे सोडतात आणि मग ते खाली जातात. आम्ही आत गेलो तेव्हा तिथे खूप गर्दी होती. उजव्या बाजूला एक मोकळी जागा बघून आम्ही फोटो काढू लागलो. जवळपास एक तासभर आम्ही तिथे घालवला, असे प्रदीप हेडगे यांनी सांगितले.
तासभर तिथे घालवल्यानंतर आम्ही खोऱ्यात उतरण्याची तयारी सुरू केली. दुपारी दीड वाजता मुलाने मला भूक लागल्याचे सांगितले. आम्ही त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याने हट्ट धरला त्यामुळे तिथल्याच एका फूड स्टॉलवर आम्ही गेलो आणि मॅगीची ऑर्डर दिली. तेवढ्या वेळात माझी पत्नी 500 मीटरवर असलेल्या पे अँड यूजच्या टॉललेटमध्ये गेली. पण ती पैसे घेऊन न गेल्याने परत आली आणि पैसे घेऊन गेली. तोपर्यंत मी आणि मुलाने मॅगी फस्त केली, असेही प्रदीप यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आम्ही चहाची ऑर्डर दिले तेव्हा गोळीचा आवाज ऐकला. दुकानदार आणि आम्हाला वाटले की जंगली प्राण्यांना हाकलण्यासाठी फटाके फोडले जात असावे. आम्ही चहा पित असतानाच दोन जण बंदुकीतून गोळीबार करत असल्याचे दिसले. एक जण खाली उतरत होता, तर दुसरा आमच्याकडे येत होता. हल्ला झाल्याचे लक्षात येताच आम्ही जमिनीवर झोपलो. तेवढ्यात माझ्या पत्नी टेबलवर ठेवलेली बॅग घेण्याचा प्रयत्न केला. त्या बॅगमध्ये आमचा फोन आणि ओळखपत्र होते. याचवेळी तिच्या कानाजवळून एक गोळी गेली. आता आम्ही मेलो असेच वाटले, पण पत्नीला आत्मविश्वास होता की आपण नक्की वाचू.
त्यावेळी तो दहशतवादी हल्ला असल्याची आम्हाला यत्किंचितही कल्पना नव्हती. आम्ही धावत पळत सुटलो. पळताना माझा मुलगा पडलाही. पण कसेतरी आम्ही तिथून निसटलो. बाहेर आल्यावर कुठे जायचे याचाही अंदाज लागत नव्हता. आम्ही 2-3 किलोमीटर पळालो. त्याचवेळी आमचा घोडेस्वार एका झाडामागे लपल्याचे आम्ही पाहिले. आम्ही त्याला विनंती केल्यानंतर त्याने एका घोडेस्वाराने मुलाला सुरक्षितपणे खाली नेले, असेही त्यांनी सांगितले. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
Pahalgam Terror Attack – देवानेच आम्हाला वाचवले! अतुल कदम यांनी मानले देवाचे आभार