गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या! काँग्रेसची मागणी

महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाल्याने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. महाराष्ट्रात जंगलराज माजले आहे, असा आरोप करतानाच, कायदा- सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

महाराष्ट्र महिला आणि मुलींसाठी सुरक्षित राहिलेला नसून मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना अटक व्हावी म्हणून केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनाही पोलीस ठाण्यात ठिय्या द्यावा लागतो, हे महाराष्ट्रात जंगलराज आल्याचे निदर्शक असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे. पोलीस सोबत असतानाही मंत्र्यांच्या मुलींची छेड काढली जाते हे कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे निदर्शक आहे, अशीही टीका त्यांनी केली.