‘बेस्ट’ टिकवण्यासाठी बैठक घ्या, अन्यथा जोरदार आंदोलन; बेस्ट कामगार सेनेचा आयुक्तांना इशारा

मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या ‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षांपासून डबघाईला आली असून उपक्रम बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बेस्ट वाचवण्यासाठी कामगार संघटनेसोबत बैठक घेऊन चर्चा करण्यासाठी आयुक्त वारंवार मागणी करूनही दखल घेत नाहीत. त्यामुळे आयुक्तांनी तातडीने बैठक घेऊन चर्चा केली नाही तर आयुक्तांविरोधात पालिकेवर धडक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी दिला आहे.

‘बेस्ट’ची स्थिती सुधारण्यासाठी आयुक्तांनी बेस्ट कामगार सेनेसोबत चर्चा करावी यासाठी आयुक्तांना दहा पत्रे देण्यात आली आहेत, मात्र आयुक्तांनी याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना बेस्टबद्दल जराही आस्था नसल्याचा आरोपही सुहास सामंत यांनी केला आहे. मुंबईमधील जनता आणि बेस्ट कामगारांची त्यांना काळजी नसल्याचेच यातून दिसत आहे. त्यामुळेच ते बेस्ट कामगार सेनेसोबत चर्चा करीत नसल्याचा आरोपही सामंत यांनी केला आहे.