
परिवहन महामंडळाकडे निधी नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा 56 टक्केच पगार देण्यात आला आहे. यावरून आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीका केली आहे. महायुतीने दिवाळखोर केला समृद्ध महाराष्ट्र माझा, अशी टीका त्यांनी X वर एक पोस्ट करत केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत की, “महायुतीने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डबघाईला आणली आहे. साठ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आपल्या कर्मचाऱ्यांना महिन्याचा पूर्ण पगारही देऊ शकत नाही, एवढी वाईट अवस्था आहे. मंत्रिमंडळात पालकमंत्रीपद आणि आमदारांना निधी देण्यावरून गँगवार सुरु आहे. जनतेचा पैसा कमिशन खाऊन आणि भ्रष्टाचार करून लुटला जात आहे. राजकीय स्वार्थापायी महाराष्ट्राला कंगाल केले जात आहे.”