
आपला समाज अशा स्तरावर गेला आहे की, एमबीबीएस प्रवेशात चांगल्या विद्यार्थ्यांचे पाय त्यांचेच सहकारी विद्यार्थी ओढतात, असे गंभीर निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
अमूक एका कॉलेजमध्येच एमबीबीएस प्रवेश मिळावा यासाठी पालक-विद्यार्थ्यांमधील अस्वस्थता दुर्दैवी आहे, असेही न्या. अतुल चांदुरकर व न्या. मिलिंद साठये यांच्या खंडपीठाने नमूद केले. अखिलेश छोटे या विद्यार्थ्याने ही याचिका केली होती. या विद्यार्थ्याला नागपूर येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. मात्र नियमानुसार प्रवेश प्रक्रिया झाली तर मला नायर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकेल, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.
अन्य विद्यार्थ्यांना डावलण्याचा हेतू
n अन्य विद्यार्थ्यांना डावलून ठरावीक कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याच्या अतृप्त इच्छेसाठी ही याचिका करण्यात आली होती. अशा याचिकेवर सुनावणी घेण्यात आमचा वेळ वाया गेला, असे स्पष्ट करत खंडपीठाने ही याचिका फेटाळली.
माणसाची लालसा संपत नाही
n माणसाची लालसा कधीही संपत नाही याचे ही याचिका उत्तम उदाहरण आहे. कारण अखिलेश अल्पवयीन आहे. वडिलांच्या मार्फत त्याने ही याचिका केली होती आणि त्याचे वडील डॉक्टर आहेत, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.