गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून माजी सभापतीची हत्या, पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून गावातून अपहरण

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील कियेर गावचे माजी पंचायत समिती सभापती सुखदेव मडावी (45) यांची शनिवारी मध्यरात्री अपहरण करून हत्या केली. रविवारी सकाळी गावालगत त्यांचा मृतदेह आढळला. मडावी यांच्या हत्येचे कारण सांगणारे पत्र नक्षलवाद्यांनी मडावी यांच्या मृतदेहाजवळ टाकले होते. दरम्यान, नक्षलवाद्यांची चोहोबाजूंनी कोंडी झाली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अशाप्रकारे हत्याकांड घडवून आणले जात असल्याची चर्चा सुरू आहे.

मडावी यांनी पेनगुंडा येथे पोलीस मदत केंद्र उघडण्यासाठी पोलिसांना मदत केल्याचा संशय केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. अतिदुर्गम भागातील नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला राहिलेल्या परिसरात त्यांच्या नाकावर टिच्चून पोलिसांनी अवघ्या एका दिवसात पोलीस मदत केंद्र उभारण्याची किमया केली. डिसेंबर महिन्यात पेनगुंडा गावाजवळ पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले. त्यानंतर नेलगुंडा येथे 30 जानेवारीला पोलीस मदत केंद्र उघडण्यात आले. यामुळे छत्तीसगडमधून गडचिरोली जिह्यात सहज प्रवेश करणाऱया माओवाद्यांची नाकाबंदी झाली होती. नक्षल्यांच्या प्रभाव क्षेत्रात पोलिसांची सुरक्षा व्यवस्था मजबूत होत असल्याने हिंसक चळवळीला मोठा धक्का बसला होता. दरम्यान, 1 फेब्रुवारीला रात्री तीन नक्षलवाद्यांनी कियेर गावातून सुखदेव मडावी यांचे अपहरण केले आणि जंगलात नेऊन गळा दाबून त्यांची हत्या केल्याचे समोर आले आहे.

वर्षभरातील पहिलीच हत्या

गेल्या वर्षाभरातील नक्षलवाद्यांनी केलेली ही पहिलीच हत्या आहे. भामरागड परिसरात नक्षलवाद्यांची आठ जणांची तुकडी सध्या सक्रिय आहे. त्यातील तिघांनीच मडावी यांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तथापि, या भागात गेल्या काही वर्षांत पोलिसांनी नक्षल्यांविरोधात धडक कारवाया केल्या. त्यात जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले, तर काहींनी आत्मसमर्पण केले. दरम्यान, मडावी हे पोलिसांचा खबरी नव्हते. मृतदेहाजवळ सापडलेल्या पत्रकावरून तपास सुरू केला आहे. परिसरात नक्षलविरोधी अभियान गतिमान करण्यात आले आहे, असे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.