आयुर्वेद हे ज्ञानाचे भांडार! माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड

मानवी आरोग्यासह शारीरिक आरोग्यावर मार्ग काढण्यासाठी आयुर्वेद महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आयुर्वेद हे विकसित ज्ञानाचे भांडार असल्याचे प्रतिपादन माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या 101 व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित समारंभात ते बोलत होते. यावेळी आयुष मंत्रालयाचे सल्लागर डॉ. मनोज नेसरी, राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप पुराणिक, उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र भागवत, सचिव डॉ. राजेंद्र हुपरीकर यावेळी उपस्थित होते. रास्ता पेठेत टिळक आयुर्वेद महाविद्यालयात हा सोहळा पार पडला.

कार्यक्रमात आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य अनंत धर्माधिकारी यांना ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित केले. तर जामनगर आयुर्वेद संशोधन केंद्राच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. तनुजा नेसरी यांचा सत्कार केला. डॉ. चंद्रचुड म्हणाले, ‘आयुर्वेदामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान स्वीकारणे गरजेचे आहे. मात्र ते करत असताना आयुर्वेदाच्या मूळ तत्त्वात बदल करायला नको. आयुर्वेदाबाबत संस्था करत असलेले काम महत्त्वाचे आहे. शिक्षण संशोधनाच्या माध्यमातून संस्था आयुर्वेदात अद्ययावतपणा आणत आहे.

नेसरी म्हणाले, आयुर्वेदाला मोठे पाठबळ मिळत आहे. त्यामुळे आयुर्वेदासाठी हा सुवर्णकाळ आहे. संस्थेच्या माध्यमातून आयुर्वेदिक शिक्षणाचा विडा उचलला गेला आहे. आधुनिक शिक्षणाची जोड संस्थेने दिली आहे. येत्या काळात उत्तर हिंदुस्थानमध्ये आयुर्वेदिक महाविद्यालय सुरू करण्याचा विचार आहे. आयुर्वेदाची बाजारपेठ वाढत असून, त्यातून देशाच्या विकासाला हातभार लाभत आहे. डॉ. हुपरीकर यांनी संस्थेची माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. मिहीर हजरनवीस, डॉ. विनया दीक्षित, डॉ. अपूर्वा संगोराम यांनी केले. डॉ. भागवत यांनी आभार मानले. कै. पु. ग. नानल राष्ट्रीय स्तरावरील आंतरवैद्यकीय पोस्टर, विषय सादरीकरण आणि निबंध स्पर्धांचे संयोजन डॉ. मंजिरी देशपांडे यांनी केले.