
उन्हाळा आला म्हटल्यावर घामाच्या धारा शरीरातून वाहायला सुरुवात होते. घामाच्या धारा सोबतीने अनेकांच्या अंगाला घामाची दुर्गंधीही मोठ्या प्रमाणावर येते. अशावेळी चारचौघात कानकोंडं व्हायला होतं. घामाच्या वासाने अनेकदा आपल्याला चारचौघात जायलाही लाज वाटते. काही जणांमध्ये घाम काखेतून येत असो किंवा पायाच्या तळव्यातूनही येत असतो. कधीकधी त्याचा वास सहन करणे कठीण होते. घामाच्या दुर्गंधीवर काही घरगुती उपाय हे खूप उपयुक्त आहे.
घामाच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय
उन्हाळ्यात अंघोळ करताना, सैंधव मीठाच्या पाण्याने करावी. या मीठामुळे बॅक्टेरियाचे संक्रमण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे घामाला दुर्गंधी येत नाही. सैंधव मीठाची खासियत म्हणजे, यामुळे आपल्या शरीरावर मुरुमे कमी येतात. म्हणून अंघोळीच्या पाण्यात सैंधव मीठ घालावे.
अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाचा पाला टाकल्यानेही घामाचा दुर्गंध कमी होण्यास मदत होते. मुख्य म्हणजे, कडुलिंब हे एक बॅक्टेरियाविरोधी आहे. त्यामुळेच घामातील बॅक्टेरिया मारण्यास आणि घामाचा दुर्गंध कमी करण्यास मदत होते. कडुलिंबाची पाने बारीक करून पाण्यात मिसळा आणि या पाण्याने आंघोळ करा. उन्हाळ्यात हे पाणी अंघोळीसाठी नियमितपणे वापरायला हवे.
अंघोळीच्या पाण्यात लिंबू आणि बेकिंग सोडा मिसळावा. यामुळेही घामाला दुर्गंधी येत नाही. मुख्य म्हणजे काखेत आणि पायातील बोटांमध्ये घामामुळे होणाऱ्या संक्रमण रोखण्यास मदत होते.
अंघोळीच्या पाण्यात निलगिरीचे तेल घालून या पाण्याने आंघोळ केल्याने घामाचा वास दूर होण्यास मदत होते. याशिवाय, हे तेल अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल देखील आहे. यामुळे कोणत्याही प्रकारच्या त्वचेच्या संसर्गापासून वाचवू शकते. म्हणून अंघोळ करताना पाण्यात निलगिरीचे तेल घालून अंघोळ करावी.