मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात 5 जण ठार

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. राज्यातील जिरीबाममध्ये शनिवारी सकाळी सशस्त्र गटांमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. एका व्यक्तीची झोपेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तर दोन प्रतिस्पर्धी सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात अन्य 4 जण ठार झाल्याचे पलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 5 किमी अंतरावर एका निर्जन ठिकाणी एकट्या राहणाऱ्या व्यक्तीवर झोपेत असताना गोळ्या झाडल्या. या हत्येनंतर जिल्हा मुख्यालयापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकड्यांमध्ये सशस्त्र गटांमध्ये गोळीबार झाला. यात चार जणांचा मृत्यू झाला.