![nagar railway](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/nagar-railway-696x447.jpg)
नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग प्रकल्पांतर्गत विघनवाडी ते बीड या 30 कि. मी. अंतराची चाचणी यशस्वीपणे पार पडली. या चाचणीत ताशी 130 कि. मी. वेगाने रेल्वे धावली. नगर ते बीडपर्यंत लोहमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांचा प्रवास सोपा व सुखकर होणार आहे. मराठवाड्यातील प्रवाशांची प्रतीक्षा आता संपली आहे.
या सर्व लोहमार्गामध्ये डिझेल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. गेल्या सात वर्षांपासून या रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. यापूर्वी नगर ते नारायणडोह, नारायणडोह ते सोलापूरवाडी, सोलापूरवाडी ते आष्टी, आष्टी ते अंमळनेर, अंमळनेर ते विघनवाडी या मार्गांची चाचणी घेण्यात आली होती. आता काल (दि. 5) विघनवाडी ते बीड या 30 किलोमीटर रेल्वेमार्गाची चाचणी यशस्वीरीत्या घेण्यात आली.
आता एकूण 165 किलोमीटर अंतराची चाचणी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच ताशी 130 कि.मी. वेगाने धावली रेल्वे या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गामध्ये महत्त्वाचे म्हणजे या रेल्वेमार्गावर अनेक मोठे पूल बांधण्यात आले. त्यासाठी मोठे तांत्रिक कौशल्य वापरून दक्षिण रेल्वेवरील सर्वात मोठा गल्डर टाकून रेल्वे रूळ अंथरण्यात आले आहेत. 300 मीटर लांबीचे व 18 मीटर उंचीचे मोठे पूल बांधण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वेगाड्या धावण्यासाठी लोहमार्गाला बळकटी मिळाली आहे. बीड ते परळीपर्यंतचा टप्पा पूर्ण होण्यास काही कालावधी लागू शकतो. तसेच यावेळी रेल्वे ताशी 130 वेगाने धावली, अशी माहिती उपमुख्य अभियंता (बांधकाम) दत्तात्रय लोळगे यांनी दिली.
रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्रशासकीय अधिकारी ए. के. पांडे, मुख्य अभियंता राकेश कुमार यादव, उप मुख्य अभियंता (बांधकाम) दत्तात्रय लोळगे, कार्यकारी अभियंता एस. सुरेश, सिनियर सेक्शन इंजिनीअर विद्याधर धांडोरे, सिनियर सेक्शन इंजिनीअर सत्येंद्र रा. कुवर, सिनियर सेक्शन संजय श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात आली.