धोकाss… सावधाsssन, मुंबईत जीबीएसचा पहिला बळी!

पुण्यात जीबीएसचा उद्रेक झाला असताना मुंबईच्या नायर रुग्णालयात जीबीएसमुळे एकाचा मृत्यू झाल्याने घबराट पसरली आहे. मुंबईत जीबीएसमुळे झालेला हा पहिला मृत्यू असून सुभाष देठे (53) असे मृताचे नाव आहे. देठे वडाळ्यातील अँटॉप हिल येथे राहत होते. तसेच पालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून कामाला होते. पुण्याहून परतल्यानंतर त्यांना जीबीएसचा त्रास जाणवू लागला होता. दरम्यान, राज्यात जीबीएसच्या मृतांची संख्या 8 वर पोहोचली आहे.

देठे यांना 23 जानेवारीला पायांमधील अशक्तपणामुळे नायर रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. श्वसन घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. उपचारादम्यान रुग्णाला जीबीएस असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान् त्यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांना यापूर्वी कोणताही ताप किंवा अतिसाराची लक्षणे नव्हती. मात्र, रक्तदाबाचा त्रास होता. रुग्णालयात दाखल होण्याआधी 16 दिवसांपूर्वी देठे पुण्याला जाऊन आले होते, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली.

मुंबईत दोन रुग्ण, प्रकृती स्थिर

गेल्या आठवडय़ात अंधेरीत जीबीएसचा एक महिला रुग्ण सापडला असून तिच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर पालघरमधील 16 वर्षांच्या मुलीवर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून जीबीएससाठी पालिका रुग्णालयांत 50 बेडची व्यवस्था केली असून गरज पडली तर सेव्हन हिल्स रुग्णालयात 150 बेडची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. जीबीएसच्या उपचारासाठी मुंबईतील सर्व महापालिका रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये सुसज्ज आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधोपचार, साधनसामग्री आणि तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

पुण्यात सर्वाधिक रुग्ण, मृत्यू

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून या आजाराने थैमान घातले असून तिथे रुग्णांचा आकडा 197 हून जास्त गेला असून यातील 20 जण व्हेंटिलेटरवर, तर 50 जण आयसीयूमध्ये आहेत. पुण्यात आतापर्यंत जीबीएसमुळे 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर एक रुग्ण पुण्याबाहेरचा आहे. आतापर्यंत 104 जणांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले आहे.

असा आहे जीबीएसचा धोका

  • जीबीएस म्हणजेच गुलेन बॅरी सिंड्रोममध्ये माणसाच्या मज्जातंतूवर विषाणू हल्ला करतो. त्यामुळे रुग्णाची रोगप्रतिकार शक्तीच कमी होते. शिवाय मेंदूकडून इतर अवयवांना मिळणारे संकेत कमी होतात.
  • यामध्ये स्नायूदेखील कमकुवत होतात. हातापायातील संवेदना कमी होऊ शकतात. गिळण्यास किंवा श्वास घेताना त्रास, हातापायांना मुंग्या येणे, दम लागणे अशी लक्षणे यामध्ये दिसतात.

पुण्यात जसा जीबीएसचा उद्रेक झाला आहे तसा उद्रेक मुंबईतील कोणत्याही एका भागात झालेला नाही. मुंबईत वेगवेगळय़ा भागांत तुरळक रुग्ण सापडले आहेत. हा आजार खूप जुना असून जीबीएसचे रुग्ण हे वर्षभर सापडत असतात. हा आजार संसर्गजन्य नसल्यामुळे मुंबईकरांना घाबरण्याचे काही कारण नाही. – दक्षा शाह, मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी

जीबीएस होण्याची कारणे

बॅक्टेरियल, व्हायरल इन्फेक्शन, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे आणि दूषित पाणी पिणे यामुळे हा आजार होऊ शकतो. त्यामुळे रहिवाशांनी स्वच्छता बाळगावी आणि कोणतीही लक्षणे दिसल्यास पालिका किंवा इतर दवाखान्यात डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.