उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या ताफ्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली, पालकांमध्ये संताप

विशाखापट्टणममध्ये उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या ताफ्यामुळे 30 विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली. यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. पण दुसरीकडे पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की इंजिनीअरिंगचे 30 विद्यार्थी जेईईच्या प्रवेश परीक्षेसाठी जात होते. सकाळी सात वाजता या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर हजर राहणे अपेक्षित होते. पण त्याचवेळी उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा ताफा जात होता. त्यामुळे या विद्यार्थ्यांना वाहतूक पोलिसांनी रोखून ठेवलं. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचायला उशीर झाला. उशीर झाल्यामुळे पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून रोखलं.

दुसरीकडे पोलिसांनी विद्यार्थ्यांचा हा आरोप फेटाळून लावला आहे. विद्यार्थ्यांची परीक्षेची वेळ ही सात वाजताची होती. पण उपमुख्यमंत्र्यांचा ताफा हा 8.41 वाजता गेला. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडवण्याचा प्रश्नच येत नाही असे पोलिसांनी सांगितले.