लोकसभा निवडणुकीत मतदार याद्यांचा घोळामुळे मतदारांचे हाल, विधानसभेत आयोगाची तयारी

लोकसभा निवडणुकीत मतदार याद्यांचा घोळ झाला होता. अनेकांची नावं मतदार यादीत नव्हती. त्यामुळे अनेक मतदार मतदान न करताच परतले होते. तसेच व्होटिंग मशीन बंद पडले होते.

पण आता निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी तयारी केल्याचे म्हटले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. तेव्हा मतदार यादीतल्या नावांसाठी सर्वे घेतल्याचे निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.

राजीव कुमार म्हणाले की लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावं मतदार यादीत नसल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या. 2021, 2022 आणि 2023 या तीन वर्षांत आम्ही सर्वेक्षण केले. मतदार याद्या प्रसिद्ध केल्या. त्यानंतर आम्ही या मतदार याद्यांमध्ये आक्षेप असल्यास तक्रार करण्याचे आवाहन केले होते. आताही मतदारांनी आपली नावं मतदार यादीत तपासावे. काही अडचण असल्याल निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी असे आवाहन कुमार यांनी केले आहे.