
विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर पाठविण्यात येणाऱ्या पाच जागांसाठी 27 मार्चला निवडणूक होत आहे. या जागांसाठी उमेदवारी मिळावी म्हणून महायुतीच्या तिन्ही पक्षांत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या पाच जागांपैकी तीन जागा भाजपच्या कोटय़ातील आहेत. यासाठी भाजपने माधव भंडारी, अमरनाथ राजूरकर, दादाराव केचे ही तीन नावे दिल्लीला पाठविल्याची चर्चा आहे.
भाजपचे विधान परिषद सदस्य असणारे प्रवीण दटके, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर तर शिंदे गटाचे आमश्या पडवी आणि अजित पवार गटाचे राजेश विटेकर हे पाच सदस्य विधानसभेत निवडून आले आहेत. यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत भाजपच्या वाटय़ाला तीन तर शिंदे गट व अजित पवार गटाच्या वाटेला प्रत्येकी एक जागा आली आहे. दरम्यान, भाजपने उमेदवारीसाठी तीन नावे निश्चित करून पेंद्रीय निवडणूक समितीकडे अंतिम मान्यतेसाठी दिल्लीला पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अजित पवार गटात अनेक इच्छुक
अजित पवार गटाच्या वाटय़ाला एक जागा आलेली आहे, मात्र या एका जागेसाठी अनेकजण इच्छुक आहेत. माजी खासदार आनंद परांजपे, सुबोध महिते, सुनील टिंगरे, दीपक मानकर, नाना काटे आदी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. माजी आमदार झिशान सिद्दिकी यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे.
शिंदे गटाकडून कोण?
शिंदे गटातून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांचे जोरदार लॉबिंग सुरू आहे. एकच जागा असल्याने कुणाला संधी द्यायची हा प्रश्न आहे. कॉँग्रेसची साथ सोडून सोमवारीच शिंदे गटात दाखल झालेल्या रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा विधान परिषदेसाठी आहे.