शिक्षण विभागाच्या नव्या जीआरचा फटका, मामाच्या गावाला जायचे गणित बिघडणार

दरवर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा आटोपली की बच्चेकंपनी थेट मामाच्या गावी धूम ठोकतात. मात्र यावर्षी हजारो विद्यार्थ्यांचे हे गणित बिघडणार आहे. शिक्षण विभागाने नवीन जीआर काढत पहिली ते नववीची परीक्षा 5 ते 25 एप्रिल कालावधीत घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पालकांसह मुलांचा हिरमोड झाला असून मे महिन्यात एकाच वेळी गावाला जाणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने गाड्यांचे आगाऊ बुकिंग मिळताना नाकीनऊ येत आहे. त्यामुळे सरकारच्या या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.

1 राज्यातील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा यंदा एकाच वेळी घेतल्या जाणार आहेत. याआधी या परीक्षा मार्च महिन्याच्या मध्यापासून ते एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला टप्प्याटप्प्याने घेतल्या जात होत्या. मात्र यावर्षी सर्वच शाळांमध्ये परीक्षा एकाच कालावधीत पार पडणार आहेत.

2 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने याबाबत आदेश जारी केले असून त्यानुसार वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा ५ ते २५ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. दरवर्षी साधारण 15 एप्रिलनंतर अनेक मुले पालकांसह गावी जातात.

3 यावेळी मात्र सर्वांचेच गणित बिघडणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ५ मेनंतर गावी जाणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने गाड्यांचे आगाऊ बुकिंग मिळताना अडचणी येत आहेत. तसेच ट्रॅफिक जामचा फटकादेखील बसण्याचा धोका

निकाल तयार करताना दमछाक उडणार

पहिली ते नववीची परीक्षा 5 ते 25 एप्रिल कालावधीत पार पडल्यानंतर निकाल लगेचच म्हणजे 1 मे रोजी घोषित केला जाणार आहे. यामुळे परीक्षा पार पडल्यानंतर पेपर तपासणी करून निकाल तयार करताना शिक्षकांची चांगलीच दमछाक होणार आहे. रायगड जिल्ह्याचा विचार करता सुमारे 4 हजार शाळांमधील सुमारे तीन ते साडेतीन लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल पाच दिवसांत तयार करण्याचे आव्हान शिक्षकांसमोर असेल. शिवाय विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी कमी होणार असून एप्रिल महिन्याच्या भयंकर उकाड्यात त्यांना शाळेत उपस्थित राहावे लागणार आहे.