महाराष्ट्र धर्माला नख लावू देऊ नका! असहिष्णुतेच्या काळोखात बंधुतेची गुढी उभारा; डॉ. तारा भवाळकर, बाबा आढाव यांच्यासह मान्यवरांची परखड भूमिका

महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण दूषित झाल्याने सर्वसामान्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे, असे परखड मत मांडत ‘महाराष्ट्र धर्माला नख लावू देऊ नका, असहिष्णुतेच्या काळोखात बंधुतेची गुढी उभारा’ असे आवाहन 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्यासह अनेक मान्यवरांनी एका जाहीर निवेदनाद्वारे केले आहे.

राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून मान्यवरांनी सलोख्याचे आवाहन केले आहे. त्यात राज्यातील सामाजिक स्थितीवर बोट ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र धर्म म्हणजे बंधुता, समता आणि सलोखा. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची पायाभरणी केली. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, शेख महंमद, जनाबाई, चक्रधर आदींनी तो रुजवला. फुले, शाहू, आंबेडकरांनी आखून दिलेल्या सामाजिक लक्ष्मणरेषेवर आपण ठाम आहोत, ती कुणी पुसू शकणार नाही. मात्र, सध्या काही शक्ती ‘बखेडा’ निर्माण करत महाराष्ट्र धर्माला नख लावू पाहत आहेत. ते होऊ देता कामा नये’, असे आवाहन मान्यवरांनी केले.

‘या असहिष्णुतेच्या काळोखात गुढी उभी करूया बंधुतेची, ईद साजरी करूया सलोख्याची, हीच आपली परंपरा आहे महाराष्ट्र धर्माची’, अशी साद मान्यवरांनी घातली आहे. डॉ. कुमार सप्तर्षि, डॉ. गणेश देवी, डॉ. रावसाहेब कसबे, अब्दुल कादर मुकादम, कपिल पाटील, निखिल वागळे, राष्ट्र सेवा दलाचे डॉ. झहीर काझी, अजित शिंदे, राजा कांदळकर यांनी हे जाहीर निवेदन काढले आहे.

 अशांततेत जनतेच्या ख्रऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

‘सध्या सण-उत्सवांचा माहोल आहे. रंगोत्सव, रमजान, लोहडी, वसंतोत्सव आणि गुढीपाडवा असे लागोपाठ सण आले आहेत. मात्र, नागपुरात हिंसाचार, कोकणातल्या घटना, अहिल्यानगर-मढी येथे धार्मिक तेढ अशा घटनांमुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण दूषित बनले आहे. या अशांततेत जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे, असे कोरडे मान्यवरांनी ओढले आहेत.