सोहळा – संत तुकाराम महाराजांचे शेतीविषयक प्रबोधन

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक

सोळाव्या शतकातील परकीय राजवटीच्या काळात पुरोगामी, सुधारणावादी, विज्ञानवादी विचार मांडून सामाजिक ाढांती घडवून आणणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज. तुकोबारायांच्या सूक्ष्म नजरेतून सामाजिक विषयांची मांडणी होत राहिली. तत्कालीन समाज जीवनातील शेतीचे महत्त्व जाणून त्यांनी शेतीसंबंधी मार्गदर्शक व उद्बोधक असे अभंग लिहिले आहेत.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची `अभंगाची गाथा’ ही मराठी साहित्य शारदेच्या दरबारातील अमोल रत्न आहे. आपल्या लेखणीतून त्यांनी दीनदुबळ्या समाजाचे प्रबोधन करताना एकही विषय सोडलेला नाही. विशेष म्हणजे सोळाव्या शतकातील परकीय राजवटीच्या काळात पुरोगामी, सुधारणावादी, विज्ञानवादी विचार मांडून त्यांनी जणूकाही सामाजिक क्रांती केली आहे.

तत्कालीन समाज जीवनात शेती हेच सर्वांचे एकमेव उपजीविकेचे साधन होते. शिक्षणाची गंगा समाज जीवनापासून कोसो मैल दूर होती. अज्ञान, अंधश्रद्धा आणि खुळचट प्रथा-परंपरेच्या गर्द अंधारात समाज चाचपडत होता. तुकोबारायांच्या सूक्ष्म नजरेतून हा सामाजिक विषय सुटला नाही. सांसारिक माणसाच्या हालअपेष्टा त्यांना नजरेआड करता आल्या नाहीत. याकरिता त्यांनी विविध विषयांवर अभंगरचना केली. शेती आणि शेतकरी हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. तसे पाहायला गेले तर आजही सांसारिक माणसाच्या जीवनातील शेती हा विषय आपुलकीचा व आदराचा राहिला आहे. तत्कालीन सर्व संसारच शेतीवर अवलंबून होता. भारत हा मुळातच शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या शेतीसंबंधी तुकाराम महाराजांनी मार्गदर्शक व उद्बोधक असे अभंग लिहिले आहेत.

तुकाराम महाराज मराठा घराण्यात जन्माला आले असले तरी त्यांच्या वडिलोपार्जित चालत आलेला व्यवसाय हा वाण्याचा होता. तत्कालीन उपजीविकेसाठी ते वाणी म्हणून प्रख्यात असले तरी पूर्वपरंपरेने असलेली शेतीसुद्धा होती. त्याकाळी वाणी हा सावकारकीसुद्धा करायचा. शेती व वाणी या व्यवसायात ते स्वत पारंगत होते. तुकाराम महाराज भोळे होते. त्यांना संसार करण्याची अक्कल नव्हती, वगैरे वगैरे…त्यांच्या विषयीच्या कपोलकल्पित कथा होत्या, हे आता संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. शेती व वाण्याच्या व्यवसायात त्यांना स्वतला आलेल्या अनुभवावरून त्यांनी आपल्या अभंगातून अनेक समाजोपयोगी प्रबोधनात्मक विचार मांडले आहेत.

शेती आले सुगी। सांभाळावे चारी कोन।
पीक आले परी। केले पाहिजे जतन।।

सुगी ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची, उत्साहाची पर्वणी असते. कारण संपूर्ण वर्षभर कष्ट केल्यानंतर शेतकऱयांच्या हातात पीक येते. या सुगीविषयी संत तुकोबाराय म्हणतात, सुगी आली की, पीक तरारून व भरभरून येते, पण याच वेळी शेतकऱयाने या सुगीभरल्या शेताचे डोळ्यांत तेल घालून रक्षण केले पाहिजे. यात कसूर केली तर हातातोंडाशी आलेला घास गेलाच म्हणून समजा.

सोकरी सोकरी सोहोकरी।
तोवरी नको उभे आहे तो गोफणीस।
गुंडा घाली पागोऱ्यास नेटे। पळती हा हा कारे।।

शेतात पीक आले की, या उभ्या पिकात खाण्यासाठी पाखरे गर्दी करतात आणि या वेळी या पिकलेल्या शेतात पाखरांना हुसकावण्यासाठी शेतकऱयांनी गोफण वापरणे आवश्यक आहे या गोफणीला लहान खडा बांधून तो गरगरा फिरवून सोडली की, शेतातील पाखरे उडून जातात. शेतात सुगीच्या काळात गोफण घेऊन हाकारा करणे अत्यंत आवश्यक असते.

पिकवावे धन। ज्याची आस करी जन ।।1।।
पुरोनि उरे खातां देतां। नव्हे खंडन मवितां।। धृ.।।
खोली पडे ओली बीज। तरीं च हाता लागे निज।।2।।
तुका म्हणे धणीं। विठ्ठल अक्षरें या तिन्ही।। 3।।

संत तुकाराम महाराज शेतात कष्ट करून मुबलक अन्नधान्य पिकवण्याचा सल्ला देतात. अन्नधान्य हे समाजासाठी अत्यावश्यक आहे. अन्नधान्यामुळे समाजाच्या पोटाचा प्रश्न मिटतो. तेव्हा सतर्क राहून शेती करण्याचा संदेश तुकोबाराय आपल्या अभंगातून देतात.

बीज पेरी सेंती। मग गाडेवरी वाहाती।।1।।
वायां गेले ऐसें दिसे। लाभ त्याचे अंगी वसे।।धृ.।। पाल्याची जतन। तरी प्रांती येती कण ।।2।।
तुका म्हणे आळा। उदक देतां लाभे फळा।।3।।

शेतकऱ्याने आपली शेती सतर्क व सावध राहून केली पाहिजे, पेरणी वेळेवर केली तर गाडय़ा भरून पीक येईल. मात्र यात हयगय केली तर पीक हातातून गेलेच म्हणून समजा. अर्थात शेतीच्या कामासाठी वक्तशीरपणा व शिस्त पाळणे आवश्यक आहे असे तुकोबाराय निक्षून सांगतात.

शिजल्यावरी जाळ। वायां जायाचे ते मूळ।।1।। ऐसा वारावा तो श्रम। अतिशयी नाहीं काम।। धृ।। सांभाळावे वर्म। उचिताच्या काळे धर्म।।2।।
तुका म्हणे कळे। ऐसे कारणाचे वेळे।।3।।

शेतकऱयाने सतत तत्पर असणे आवश्यक आहे असे सांगताना संत तुकोबाराय म्हणतात, आपण शेतीची मशागत करताना ती अत्यंत वेळेवरच केली पाहिजे. वेळ गेल्यावर केलेले श्रम वाया जाते. त्याचा काहीही उपयोग नाही. ही बाब स्पष्ट करताना तुकोबाराय सांगतात, अन्न शिजेपर्यंत त्याला ऊर्जा देणे चांगले, पण अन्न शिजल्यावर ही त्याला ऊर्जा देणे चालूच ठेवले तर ते अन्न जळून करपून जाईल. तात्पर्य वेळेतच सर्व शेतीची कामे करणे महत्त्वाचे आहे.

मढे झांकूनियां करिती पेरणी। कुणबियाचे वाणी लवलाहें।।1।। तयापरी करीं स्वहित आपुलें। जयासी फावले निर्देश।।धृ.।। ओटीच्या परिस मुठीचें तें वाढे। यापरी कैवाडें स्वहिताचें।।2।। नाही काळसत्ता आपुलिये हातीं। जाणते हे गुंती उगविती।।3।। तुका म्हणे पाहें आपुली सूचना। करितो शाहाणा मृत्युलोकीं।।4।।

कुणबी म्हणजे शेती कसणारा शेतकरी होय. सुगीच्या काळात येणाऱ्या पिकासाठी आधी पेरणी करावी लागते. ही पेरणी योग्य त्या नक्षत्रावर व्हायला हवी. एकदा का पेरणीची वेळ निघून गेल्यावर होणारी पेरणी उत्पादन देत नाही. यामुळे पेरणीची वेळ कोणत्याही परिस्थितीत गमावून चालणार नाही. कारण ही चुकविणारी वेळ संपूर्ण शेतकऱयांच्या अडचणीत भर घालणारी ठरते. मोठा आर्थिक फटका बसतो. म्हणून शेतकऱयांच्या जीवनात पेरणीला फार महत्त्व आहे. पेरणीची अचूक वेळ पाळणे इतके महत्त्वाचे आहे की, पेरणीच्या वेळी घरात कुणी मयत झाला तर त्याचे प्रेत झाकून ठेवावे व आधी पेरणी करावी असे स्पष्ट शब्दांत संत तुकोबारायांनी शेतकऱयांना मार्गदर्शन केले आहे.
संत तुकोबारायांनी आपल्या अभंगातून तत्कालीन समाज जीवनात महत्त्वाची असणारी शेती व शेतकऱयांच्या बाबतीत आवर्जून मार्गदर्शन केले आहे. ते म्हणतात,

वोणव्या सोनारी। शेत खाल्ले पाखरी।। तैसा खाऊ नको दगा। निदसुरा राहुनिया जागा।।

उभ्या पिकात जेव्हा पीक येते, तेव्हा त्याचे रक्षण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. नाही तर पक्षी पिकांचा सुपडा साफ करतात. हातची पिके गेली की, शेतकऱयांचे मोठे नुकसान होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी पुढे दोन सुगी लागतात. अर्थात ही बाब मानवी जीवनातही लागू पडते.

इतर कोणत्याही व्यवसायात जितके सावध व जागरूक रहावे लागते, त्यापेक्षा अधिक सावधानता व जागरूकता शेतीसाठी बाळगायला हवी. हा मोलाचा संदेश संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून दिला आहे.

(लेखक मानसशास्त्र व लोककलेचे अभ्यासक आहेत.)