
अनुसूचित जाती-जमातींच्या उप-योजनांसाठीचा राखीव निधी दुसरीकडे वळवण्याची प्रथा तत्काळ थांबवा, अशी मागणी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी संसदेत केली. अनुसूचित जाती-जमातींच्या उप-योजनांसाठी राखीव असलेला निधी हा अनुसूचित जाती-जमाती समुदायाच्या शिक्षण, आरोग्य, पोषण, महिला कल्याण व आर्थिक विकासासाठीच व्हायला हवा, असेही त्या म्हणाल्या.
संसदेत शून्य प्रहरात अनुसूचित जाती-जमातींच्या निधीचा मुद्दा उपस्थित करत खासदार प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, अनुसूचित जाती-जमातींच्या उप-योजनांसाठी राखीव असलेला निधी ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांसाठी वापरण्यात येत आहे. हे केवळ अन्यायकारकच नाही तर घटनात्मक तरतुदींनाही हरताळ फासणारे आहे. हा निधी दुसरीकडे वळवण्याची प्रथा तत्काळ थांबवावी आणि या उप-योजनांना कायदेशीर दर्जा द्यावा असे त्या म्हणाल्या.