आषाढी वारी पालखी सोहळा, संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे 19 जूनला पंढरीकडे प्रस्थान

चैत्री यात्रा संपली, आता आषाढी वारीचे वेध लागले आहेत. त्यानुसार आषाढी वारीसाठी श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे 19 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यातील वाढती वारकर्‍यांची संख्या लक्षात घेता पालखी तळ अपुरे पडत आहेत. नातेपुते, माळशिरस, वेळापूर येथील पालखी तळाची जागा बदलून द्यावी, अशी मागणी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी केली.

आषाढी वारीच्या नियोजनाची बैठक पंढरपूर येथे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व दिंडी समाजाची सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 7 रोजी पार पडली. या बैठकीस सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त अ‍ॅड. राजेंद्र उमप, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्त ज्ञानेश्वर जळगावकर, विठ्ठल महाराज वासकर, नाना महाराज वासकर, रामभाऊ चोपदार, दिंडी समाजाचे मारुती कोकाटे, राजाभाऊ थोरात, भाऊ फुरसुंगीकर यांच्यासह दिंडी समाजाचे प्रमुख पदाधिकारी, दिंडी प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी शेडगे दिंडी क्रमांक 3 चे प्रमुख जयसिंग महाराज मोरे यांच्यासह वर्षभरात निधन पावलेल्या दिंडीकर्‍यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

या बैठकीत योगी निरंजनाथ म्हणाले की, यंदाच्या पालखी सोहळ्यात फारशा अडचणी नाहीत. परंतु हडपसरपासून पालखी मार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. ते काम पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे. दिवेघाटात रस्ता रुंदीकरण सुरू आहे, तेथे पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता आहे. तेथे लोखंडी जाळी मारावी. फलटण ते धर्मपुरी अपूर्ण रस्ताही लवकर पूर्ण करावा. नातेपुते, माळशिरस व वेळापूर येथील पालखी तळ अपुरे पडत आहेत. नातेपुते येथे गावाबाहेर पालखी तळाला जागा द्यावी, माळशिरस येथे कृषी कार्यालयाजवळील जागा मिळावी. तर वेळापूर येथील पालखी तळ हा महामार्गाच्या कामात गेला आहे. तेथे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. या तळाची जागा बदलून शेती महामंडळाची जागा पालखी तळासाठी द्यावी, अशी मागणी योगी निरंजनाथ यांनी केली.

या बैठकीत दिंडी समाजाने पाणी, फिरती शौचालये याविषयी प्रश्न उपस्थित केले. यंदा प्रस्थान दिवशी गुरुवार आल्याने माउलींच्या पालखी सोहळ्याचे 19 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजता प्रस्थान होणार आहे. यंदा तिथीचा क्षय झाल्याने पालखी सोहळ्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे पालखी सोहळा प्रमुख डॉ.भावार्थ देखणे यांनी सांगितले.