
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील गोहा गावात एका दलित कुटुंबाला जमिनीच्या वादातून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या कुटुंबावर 20 ते 25 जणांनी हल्ला केला असून या हल्ल्यात कुटुंबातील सात जण जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुकेश कुमार जाटव हे त्यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या शेतावर राईच्या पिकाची कापणी करायला गेले होते. त्यावेळी 20 ते 25 जण तिथे आले व त्यांनी तुम्ही आमच्या वाटणीच्या 5 बिघा जमिनीवर शेती करत असल्याचा आरोप जाटव यांच्यावर केला. त्यावरून जाटव व त्या तरुणांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर तेथे आलेल्या जमावाने जाटव यांच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
या जमावाने मारहाण करताना महिला व वृद्ध देखील बघितले नाही. ते लाठ्यांनी आम्हाला मारहाण करत होते, असे जाटव यांनी पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.