
गोव्यात बिहार दिनाच्या निमित्ताने झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गोव्यात आलेल्या प्रत्येकाने गोव्याची संस्कृती आत्मसात केली पाहिजे. आम्हाला बिहारचे गुन्हेगार गोव्यात नकोत, असं वादग्रस्त वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे. गोव्यात होणाऱ्या गुन्ह्यांमुळे, त्यातील बिहारच्या गुन्हेगारांच्या सहभागामुळे बिहारचेच नाव खराब होते असंही त्यांनी सांगितले.
दरवर्षी 22 मार्च हा दिवस ‘बिहार दिन’ म्हणून साजरा केला जातो. बिहारसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. यंदाच्या बिहार दिनाचा कार्यक्रम गोव्यातही आयोजित करण्यात आला होता. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बिहार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. सर्व बिहारी नागरिकांना गोव्याची संस्कृती जपण्याचे आणि पालन करण्याचे आवाहन केले. गोव्यातील लोक सर्व धर्म समभावाने राहतात. आम्हाला गोव्यात बिहारचा गुन्हेगार नको आहे. गुन्हेगारातील सहभागामुळे बिहारचेच नाव खराब होते, असे ते म्हणाले. याआधीही त्यांनी बिहारच्या स्थलांतरित कामगारांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. गोव्यातील 90 टक्के गुन्हे हे बिहारी आणि उत्तर प्रदेशातील लोकांमुळे होतात असं ते म्हणाले होते. आता त्यांच्या या विधानामुळे पुन्हा नवा वाद होण्याची शक्यता आहे.