सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी सरकारी महाविद्यालय, चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन राज्य सरकार मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामार्फत नवीन सरकारी महाविद्यालयाची स्थापना करणार आहे. त्यासाठी तातडीने पावले उचलली जातील, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत केली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने तलाठी भरतीसाठी संधी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इतर पदांच्या भरतीबाबत सरकार त्यांना संधी देईल का, उच्च शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी प्रशिक्षण केंद्र उभारणार का, तसेच सरकारी महाविद्यालय स्थापन करणार का, असा प्रश्न निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी प्रश्न विचारला त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले.

ते म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागांतील 391 विद्यार्थ्यांनी तलाठी भरतीसाठी अर्ज सादर केले होते त्या सर्वांना संधी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इतर रोजगारासाठी सरकारने आदेश काढून निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील उमेदवारांना रोजगाराच्या संधीकरिता, नोकरीकरिता मुभा देण्याची सरकारची भूमिका स्पष्ट आहे. त्या भूमिकेनुसार सीमा भागातील उमेदवारांना तलाठी भरतीसाठी सामावून घेण्यात आल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

सीमा भागातील विद्यार्थ्यांना तलाठी भरतीमध्ये संधी देण्याप्रमाणेच इतर पदांबाबत संधी देण्यात येईल आणि उच्च शिक्षण व स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात प्रशिक्षण केंद्र तसेच कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्याबाबत सरकार कार्यवाही करील, असे आश्वासनही बावनकुळे यांनी दिले.