कोणता झेंडा घेऊ हाती? विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत नेत्याची चलबिचल, 2 दिवसात 4 पक्ष बदलले

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते या पक्षातून त्या पक्षामध्ये उड्या मारत आहेत. अर्थात उड्या मारायलाही काहीतरीह सीमा असावी असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. मात्र सगळी सीमा पार करत चंद्रपूर जिल्ह्यातील एका उपसरपंचाने 2 दिवसात 4 पक्ष बदलण्याचा पराक्रम केला आहे. या उपसरपंचाची चर्चा राज्यभर सुरू आहे.

आधी काँग्रेस, मग शेतकरी संघटना, मग पुन्हा काँग्रेस आणि आता भाजप असा लांबचा प्रवास अवघ्या दोन दिवसात या उपसरपंचाने केला. रामलू राठोड असे उपसपंचाचे नाव असून ते चंद्रपूर जिल्ह्यातीत राजुरा तालुक्याती सुब्बई गावचे रहिवासी आहेत.

विधानसभा निवडणूक जाहीर होताच नेते सक्रिय झाले तसे कार्यकर्तेही कामाला लागले. पक्षाने अनेक वर्ष उमेदवाऱ्या, मंत्रीपदं देऊनही गद्दारी करण्याची घाई नेत्यांना झाली आहे. अशातच राजुरा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या सुब्बई येथील उपसरपंच रामलू राठोड यांनी दोन दिवसात चार पक्ष बदलत लक्ष वेधून घेतले.

रामलू राठोड हे मूळचे काँग्रेस पक्षाचे आहेत. चार दिवसापूर्वी राजुरा येथील शेतकरी संघटनेच्या कार्यालयात जाऊन राठोड यांनी पक्ष प्रवेश केला. पक्षप्रवेशाची बातमी माध्यमात येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे घर गाठत मनधरणी केली. यानंतर त्यांनी पुन्हा घरवापसी केली. ही बातमी पसरत नाही तोच त्यांनी पुन्हा शेतकरी संघटनेचे कार्यालय गाठत पक्षप्रवेश उरकून घेतला.

राठोड यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला त्याच दिवशई गावात भाजपचे काही नेते आले होते. याची बातमी कळताच राठोड यांच्या मनात पुन्हा पक्षबदल करण्याचे खुळ आले आणि त्यांनी भाजप नेत्यांच्या हस्ते पक्षप्रवेशही केला. अवघ्या 2 दिवसात त्यांनी 4 वेळा पक्ष बदलला. याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.