Chandrapur News : राज्य सरकारच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका, वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यामुळे OBC संघटना आक्रमक

चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 72 नवीन वसतीगृह सुरू करण्याची घोषणा मिंधे सरकारने केली होती. त्यासाठी प्रवेश अर्ज सुद्धा मागवण्यात आले, मात्र विद्यार्थ्यांना अद्याप वसतिगृहांमध्ये प्रवेश देण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

मिंधे सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 72 नवीन वसतीगृहांची घोषणा केली होती. त्यासाठी आदेश काढण्यात आले आणि त्यानंतर विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आली. परंतू मिंधे सरकारच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना अजूनही वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही. विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मिळेत ते काम करून विद्यार्थी घराचे भाडे देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी ओबीसी संघटना आक्रमक झाल्या. समाजकल्याण अधिकारी कार्यालयासमोर मुक्काम ठोकत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच जोपर्यंत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही, अशी ठाम भुमिका आंदोलकांनी घेतली आहे.