जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, चंद्राबाबू नायडू यांचे जनतेला आवाहन

वृद्धांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता जोडप्यांनी जास्तित जास्त मुले जन्माला घाला असा अजब सल्ला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिला आहे. यावेळी चंद्राबाबू यांनी वृद्धांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे.

”लोकसंख्या घटणे आणि तरुणांचे स्थलांतर ही बाब राज्यासाठी धोकादायक आहे. दोनापेक्षा जास्त मुलं जन्माला घालण्यासाठी आम्ही जोडप्यांना प्रोत्साहन देणार आहोत. दोन पेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या जोडप्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यास प्रतिबंध करणारा पूर्वीचा कायदा आम्ही रद्द केला आहे. दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता याव्यात, यासाठी सरकार कायदा आणण्याचा विचार करत आहे, असे चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले आहे.

देशात प्रजनन दर हा सरासरी 2.1 आहे तर आपल्या राज्यात हा दर 1.6 वर आला आहे. राज्यात वृद्धांची संख्या वाढत चालली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील खेडे गावांमध्ये केवळ वृद्ध लोक आहेत. कारण तरुण पिढी देशाच्या विविध भागात आणि परदेशात स्थलांतरित झाले आहेत. राज्याच्या दृष्टीने हे चांगले नाही. या दिशेने पावले न उचलल्यास आंध्र प्रदेशला जपान आणि युरोपसारख्या परिस्थितीला सामोरे जावं लागेल”, अशी चिंता चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केली.