वांद्र्यातील चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, सणासुदीच्या काळात ‘ही’ सेवा केली बंद

वांद्रे रेल्वे स्थानकात रविवारी सकाळी वांद्रे गोरखपूर एक्सप्रेस पकडण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली व त्यामुळे चेंगरांचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत नऊ प्रवासी जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेने दिवाळी व छट पूजेच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेने सणासुदीच्या काळात रेल्वे स्थानकांवरील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्रातील काही प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 27 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद करण्यात आली आहे. 9 नोव्हेंबरपासून पुन्हा पूर्वी सारखे प्लॅटफॉर्म तिकीट दिले जाणार आहे.

रेल्वेने प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयातून ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या आजारी प्रवाशांना सूट देण्यात आली आहे.