
नागपुरात थंडीतही राजकीय वातावरण तापले आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. स्पष्ट बहुमत असतानाही तब्बल 22 दिवसांनी फडणवीस सरकराचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात भाजपचे 19, शिंदे गटाचे 11 आणि अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. तर अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रिमडळात स्थान मिळाले नसल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे.
मंत्रिमडळात समावेश नसलेले भाजपच्या दिग्गज नेत्यांमध्ये सुधीर मुनंगटीवार, रवींद्र चव्हाण यांचा समावेश आहे. तर अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळात संधी मिळालेली नाही. तसेच शिंदे सेनेच्या दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांनीही मंत्रीपद देण्यात आलेले नाही. या नेत्यांना मंत्रिमंडळ स्थापनेआधी फोन आले नसल्याने त्यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
या नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महायुतीकडून करण्यात येत आहे. अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आरपीआयच्या (आठवले गट) रामदास आठवले यांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला एक कॅबिनेट आणि एका विधानपरिषद सदस्यत्वाचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात काहीही मिळाले नाही, असे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.