बीएसएनएलने आता ग्रामीण भागाकडे वाढविले लक्ष; रत्नागिरी जिल्ह्यात नवे 188 टॉवर

खासगी दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या टेरीफ किंमतीमध्ये वाढ केल्याने रत्नागिरीमधील ग्राहक आता बीएसएनएलकडे वळू लागले आहेत. हे ग्राहक टिकून राहावेत, त्यांना विनाअडथळा सेवा मिळावी म्हणून बीएसएनएलनेही आता ग्रामीण भागाकडे लक्ष वाढवले आहे. शहरासह रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात नवे 188 टॉवर युद्ध पातळीवर उभारण्याचे काम नुकतेच हाती घेतले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बीएसएनएलला रेंज नाही अशी तक्रार येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

उपप्रबंधक अरुण चवळी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, खासगी दूरसंचार कंपन्यांच्या दरवाढीमुळे ग्राहकांचा ओढा बीएसएनएलकडे वाढत आहे. खासगी दूरसंचार कंपन्यांच्या दरवाढीमुळे बीएसएनएलवर लोकांचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे आमच्या सेवा अधिक सशक्त कशा होतील, याकडे आमचे लक्ष आहे. फोरजी सॅच्युरेशन ही मोहीम आम्ही हाती घेतली असून, या माध्यमातून जिल्ह्यात नव्हे 188 टॉवर उभे करण्याचे काम सुरू आहे.

सध्या रत्नागिरी मध्ये 324 टॉवर आहेत. यात नव्या 188 टॉवरची भर पडणार आहे. त्यामुळे खासगी खासगी कंपन्यांपेक्षा बीएसएनएलच्या टॉवरची संख्या वाढलेली दिसेल 188 पैकी 90 टॉवरचे काम प्रत्यक्षात सुरू झालेले असून हे अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित 98 टॉवर उभे करण्यासाठी तांत्रिक कामे चालू आहेत. ती पूर्ण करून आम्हाला तारीख 31 डिसेंबरपर्यंत ते टॉवर उभे करायचे आहेत. त्यानंतर ग्राहकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी होतील. रत्नागिरी बरोबरच सिंधुदुर्ग मध्ये दीडशे कोल्हापूर मध्ये शंभर नवे टॉवर आम्ही उभे करीत आहोत याशिवाय या तीनही जिल्ह्यात आणखी टॉवरची आवश्यकता आहे का याच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे, असेही चवळी यांनी सांगितले.

जुलै महिन्यात साडेतीन हजार सिम खरेदी
चवळी म्हणाले की, खासगी दूरसंचार कंपन्यांनी 25% दरवाढ केली असली तरी बीएसएनएलने कसलीही दरवाढ केलेली नाही. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने बीएसएनएलकडे वळत आहेत. गेल्या पंधरा दिवसात रत्नागिरीत साडेतीन हजार जणांनी बीएसएनएलचे सिम कार्ड घेतले आहे. याच कालावधीत जवळपास 1400 जणांनी आपले खासगी कंपन्यांचे सिमकार्ड बीएसएनएल मध्ये पोर्ट केले आहे. बीएसएनएलचे नवीन सिम कार्ड घेण्याकडे आणि पोर्ट काढण्याकडेही नागरिकांचा कल वाढत आहे.