बोरिवली-चारकोप पुरेशा ‘बेस्ट’ बस नसल्याने प्रवाशांची गैरसोय, शिवसेनेची गोराई आगारावर धडक

बोरिवली पश्चिम विभागातील शांती आश्रम, योगीनगर, एक्सर मार्ग येथून चारकोप येथे ‘बेस्ट’ बस सेवा नसल्याने शेकडो नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. याची गंभीर दखल घेत आज शिवसेनेने गोराई ‘बेस्ट’ आगारावर धडक देत तातडीने बस सेवा सुरू करण्याची मागणी केली.

चारकोपमध्ये शाळा, रुग्णालयांची संख्या मोठी असून इंडस्ट्रीयल एरियाही आहे. त्यामुळे बोरिवलीतील शांती आश्रम, योगीनगर, एक्सर मार्ग आदी ठिकाणांहून चारकोप येथे जाण्यास पुरेशा बेस्ट बस नसल्याने सर्वसामान्यांना रिक्षा प्रवासासाठी अवाचेसवा रक्कम भाडे द्यावे लागते. प्रवाशांची गैरसोय दूर करावी यासाठी शिवसेनेचे माजी आमदार विलास पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा क्र. 10च्या शिष्टमंडळाने गोराई बस आगारप्रमुख हरीश शेट्टी यांना निवेदन दिले. यावेळी उपविभागप्रमुख विनायक सामंत, शाखाप्रमुख मिलिंद म्हात्रे, देवेंद्र आंबेकर, किरण हेदुलकर, नरोत्तम म्हात्रे, सतीश शिरोडकर, प्रवीण ताम्हणकर, भूषण वारेकर, ‘बेस्ट’ कामगार सेनेचे मधुकर इंदप उपस्थित होते.