सिल्लोडमधला जुलुमशाही आणि गद्दारीचा कलंक पुसायचा आहे, मातोश्रीतून उद्धव ठाकरे गरजले

सिल्लोडमध्ये गेल्यावेळी चूक झाली ती यावेळी सुधारायची आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच सिल्लोडमधला जुलुमशाही आणि गद्दारीचा कलंक पुसायचा आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजप नेते सुरेश बनकर यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश घेतला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, सिल्लोड मतदारसंघात मागच्या वेळी चूक झाली आता ती चूक सुधारायची आहे. सिल्लोडला जुलुमशाही आणि गद्दारीचा कलंक लागला आहे. हा कलंक पूसून टाकण्यासाठी मशाल तुमच्या हातात दिली आहे. मला खात्री आहे तुम्ही ध्येयाने वेडे झाले आहात आणि त्वेषाने पेटलेले आहात. जुलुमशाही आणि गद्दारी संपवयाची असेल तर तुम्ही एकत्र आलात तर हा विजय अवघड होणार नाही. हा विजय जरी सोपा वाटत असला तरी गाफील राहता कामा नये. आजपासून मशाल घरोघरी पोहोचवायला सुरू करा. निवडणूक लागल्यानंतर मी सुद्धा मतदारसंघात येईन. मला तुमच्याकडून वचन हवंय की सिल्लोडमधून मला शिवसेनेचा आमदार पाहिजे.