
भाजपने आसाममध्ये ‘बिहार दिवस’ साजरा करण्याची योजना आखली होती, मात्र आता हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की भाजपवर ओढवली. काही प्रादेशिक राजकीय पक्ष, समुदाय-आधारित संघटना आणि युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (इंडिपेंडंट) यांच्या निषेधानंतर भाजपने शनिवारी पूर्व आसामच्या तिनसुकियामध्ये ‘बिहार दिवस’ साजरा करण्याची योजना रद्द केली.
याबाबत प्रदेश भाजप अध्यक्ष आणि खासदार दिलीप सैकिया म्हणाले, स्थानिक भावना दुखावू नयेत म्हणून पक्षाने बिहार दिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला, मात्र दिल्ली, तामीळनाडू, महाराष्ट्र, नागालँड आणि इतर राज्यांनी ‘बिहार दिवस’ साजरा केला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. तर ‘बिहार दिवस’ साजरा करण्यास विरोध केल्याने जातीय द्वेष दिसून येतो, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले.
हिंदीबाबत बढाई मारणारे हिमंता बिस्वा शर्मा कुठे आहेत?
भाजपवर हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की ओढवल्यानंतर काँग्रेसने यावर टीका केली आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलेय, आसाममधील तिनसुकियामध्ये शनिवारी ‘बिहार दिन’ साजरा केला जाणार होता, आता सरकारने तो कार्यक्रम रद्द केला. या कार्यक्रमाला उल्फा (आय) सारख्या गटांनी विरोध केला. निदर्शने झाली आणि कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली. अशा वेळी भाजप आणि हिंदीबाबत विनाकारण बढाई मारणारे हिमंता बिस्वा शर्मा कुठे आहेत? तामीळनाडूमध्ये असा कार्यक्रम रद्द झाला असता तर त्यांनी या मुद्दय़ाचे राजकारण केले असते, तेथे अशी शांतता असती का? असा सवालही त्यांनी केला.