Bihar News : पिस्टलशी खेळणं जीवावर बेतलं, वडिलांच्या हलगर्जीपणामुळे तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू

पटनामधील रुपसपूरमध्ये 1 जूलै रोजी तीन वर्षांच्या मुलीचा गोळी लागल्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलीसांनी तपास केला असता वडीलांच्या हलगर्जीपणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे.

1 जुलै रोजी पटनामधील रुपसपूर येथील तीन वर्षीय मुलगी अनुष्का कुमारीचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. त्यानंतर तिचे वडिल हरिओम कुमार यांनी रुपसपूर पोलीस ठाण्यात अज्ञान व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. हरिओम कुमार यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अज्ञान व्यक्तींनी मुलीला गोळी मारली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी वेगाने सुत्र हालवत सदर घटनेचा तपास केला असता वडिलांच्या हलगर्जीपणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर पिस्टलने वडिल आणि मुलगी खेळत असताना चुकून गोळी मुलीला लागली आणि मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत मुलीच्या वडिलांनी गुन्हा कबुल केला आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून मॅगझिन आणि काडतुसे जप्त केली आहेत.